Sunday 19 February, 2023

दिवाळी पहाट

 BLOG


*दैवी ऊर्जेशी एकरूप झालेली एक दिवाळी पहाट.*


दि ३ नोव्हेंबर २०२१ रोजी

दिवाळीच्या निमित्ताने Saturday Club Global Trust-SCGT वाकड चॅप्टर तर्फे आयोजित पिंपरी चिंचवड रिजन मधील पिंपरी-चिंचवड , औंध-बाणेर चॅप्टर करिता दिवाळी पहाटचा कार्यक्रम पार पडला.


कार्यक्रमाचे प्रायोजक होते

पैस रंगमंचचे श्री प्रभाकर पवार(चिंचवड) आणि रेझोनन्स स्टुडिओचे श्री तेजस चव्हाण. ज्यांनी स्वखुषीने रसिक प्रेक्षकांसाठी हा कार्यक्रम केला.


सांगितिक दिवाळी पहाटची सुरूवात SCGTचे संस्थापक स्व. माधवराव भिडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलनाने लनाने  झाली . सूत्रसंचालक  प्राजक्ता गव्हाणे यांच्या अलंकारिक शब्दांनी सुरुवातीपासूनच जादू सुरू केली. या आगळ्या वेगळ्या रंगमंचचा उल्लेख त्यांनी निकट रंगमंच असा केला. पुण्यापेक्षा पिंपरी चिंचवडची पहाट कशी वेगळी हे सांगताना," इथे दिवसाची सुरुवात भोंग्याने होते, सतत जागं आणि वेगानं धावणारं शहर, आवडीच्या शिव्या खात भंडारा डोंगरावर विठोबाच्या भेटीला जाणारे तुकाराम महाराज." अशी शब्द नव्हे तर  प्राजक्ताच्या फुलांची उधळण करत त्यांनी बहारदार सूत्रसंचालन केले आणि सादरकर्ते व रसिक यांच्यातील दुवा साधला.


अक्षय घाणेकर तरुण गायकांमधले एक नवीन नाव.  नाव कमवायला खूप कष्ट घ्यावे लागतात पण भरपूर मेहनत करून ज्यांनी सा रे ग म पा ,व्हाईस ऑफ इंडिया, पुणे आयडॉल अशा कार्यक्रमांना आणि पुरस्कारांना  सन्मान मिळवून दिला आहे त्यांच्या निरागस स्वरांनी म्हणजेच, "सूर निरागस हो..." या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. 


मनीषा देशपांडे यांनी," माय भवानी तुझे लेकरू कुशीत तुझिया येई सेवा..." अशा सदाबहार गाण्यांनी मैफलीत रंगत भरली.


लिटिल मास्टर आदिती धर्माधिकारी,सातवीत शिकणारी मुलगी हिच्या गायनाने तर रसिकांच्या हृदयात शिरकाव केला . रसिकांच्या भावना आणि अश्रू दाटून आले. हिच्या गायनाची सगळ्यांनी प्रशंसा केली.


संगीतकार तेजस चव्हाण यांनी संगीतबद्ध केलेली आणि प्रीती तेजस यांनी गायलेली काही गाणी सादर करण्यात आली . तेजसने संगीत संयोजन केलेल्या आणि बेला शेंडे यांनी गायिलेल्या ज्या मराठी ब्रेथलेस गाण्याची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये नोंद झाली आहे ते गीत त्यांनी सादर केले ज्याची शब्दरचना प्राजक्ता गव्हाणेची आहे हे ऐकून फार विशेष वाटले . तेजसने कैलास खेर यांनी गायलेले एक सुफी, "हिरे मोती मै ना चाहू....सैया..." हे गीत सादर केले. तेजसने संगीतबद्ध केलेले ," कर कटेवरी उभा विटेवरी वास पंढरपूरी,  माझे विठ्ठल रखुमाई..."हे भक्तीगीत अक्षयने सादर केले. या गायकांनी स्वरांची जी काही उधळण केली त्यामुळे रसिकांना निर्विचारतेचा अनुभव मिळाला. दैवी ऊर्जेशी एकरूप होणं यापेक्षा काय वेगळं असतं.


महेश गाढवे यांनी तबल्यावर साथ संगत केली. गायनाइतकेच तालवाद्य पण महत्वाचे असते हे त्यांच्या ठेक्याने रसिकांच्या लक्षात आल्यावाचून राहिले नाही.


महामारीमुळे गेले दीड-पाऊने दोन वर्षें कलाकार आणि रसिक यांची ताटातूट झाली होती. आजचा प्रसंग असा होता की, कलाकाराला रसिक हवा होता आणि रसिकाला कलाकार. ऑन लाईनला कंटाळलेले दोघेही आज तृप्त झाले.


आजचा कार्यक्रम हा SCGT मेंबर्ससाठीचा एकदम खाजगी कार्यक्रम जाणवला . जसं की 'कट्यार काळजात घुसली',चित्रपटात राज्याच्या राजवाड्यात फक्त राजासाठी मैफिल होत आहे किंवा पु. ल. चित्रपटात दाखवलंय तसं कोणाच्यातरी घरात फक्त कलेचा आस्वाद घ्यायला गर्दी नव्हे तर दर्दी जमले आहेत. पहाटे सुरू झालेल्या संगीत कार्यक्रमात रसिक प्रेक्षकांना अल्फा, थिटा हर्ट्स अनुभवत  अडीच-तीन तास कधी संपले ते समजलेसुद्धा नाही.कधी कधी टाळ्या नाही तर ही परा वाणीची शांतता पण अनुभवावी असे वाटते. 


दिवाळी पहाट २०२१ संस्मरणीय करण्याकामी निलेश कुलकर्णी,योगीराज देवकर, गौरव गायकवाड, अनुक्रमे चेअरमन,सेक्रेटरी, ट्रेझरर,  वाकड चॅप्टर , कोअर टीम,इतर दोन चॅप्टरचे CST  आणि स्वप्नील कुलकर्णी,PCMC रिजन हेड यांनी भरपूर मेहनत घेतली.


शेवटी भेटवस्तू देवून,आभार मानून ,अल्पोपहार घेऊन कार्यक्रम संपला पण तो पुढील बराच काळ स्मरणात राहील तो श्री तेजस चव्हाण यांनी आजचा दिवस समृद्ध केला त्यामुळे. कोणालाही हा अभरूचीसंपन्न कार्यक्रम आयोजित करायचा असेल तर श्री तेजस चव्हाण यांच्याशी जरूर संपर्क साधण्यात यावा . मो.95611 50916.


योगीराज देवकर.

लेखक,प्रेरक,प्रशिक्षक.

PCMC Region Blog Writer.

www.motivationacademy.in

केरळ सहल

 *केरळ पर्यटन-एक सुखद अनुभव.*


मी,सौ अनिता देवकर,श्री गिरीश(आप्पा)गायकवाड,

सौ सुनीताताई गायकवाड,श्री अमोल शेटे आणि फॅमिली असे आम्ही सर्वांनी २२ ते २९ मार्च २०२२ दरम्यान केरळचे पर्यटन केले.


श्री निलेश कुलकर्णी यांच्या आकांक्षा हॉलिडेज प्रा ली तर्फे ही टूर आयोजित केली होती. कुलकर्णी यांना कार्पोरेट लॉजिस्टिकसचा अनुभव आहे. त्यांनी नव्याने ट्रॅव्हल एजन्सीचा श्री गणेशा केलेला आहे. त्यांच्याकडे बुकिंग करणारा मी पहिलाच पर्यटक.


कोची एअरपोर्ट ते त्रिवेंद्रम एअरपोर्ट इनोव्हा कार सेवा आणि कोची(फोर्ट कोची,वास्को द गामा चर्च, राजा वर्मा पॅलेस, कलाडी ),मुन्नार( फ्लॉवर गार्डन,रस्तो-रस्ती फोटो पॉईंट्स,टी फॅक्टरी,मत्त्युपट्टी डँम,एको पॉईंट),

थेक्कडी( स्पाइस प्लँटेशन व्हिजिट,कलरीपटू मार्शल आर्ट, कथकली डान्स, एलिफंट राईड,पेरियार वाइल्ड लाईफ सँच्युअरी बोट राईड),आलेप्पी (व्हेंबनाड लेक हाउस बोट राईड),कोलम जवळ( पूवार आयलंड रिसॉर्ट)कन्याकुमारी,त्रिवेंद्रम( पद्मनाभम टेम्पल) असा खास आमच्यासाठी टूर डिझाईन केला होता.  


कुलकर्णीने आमच्यासाठी काय वेगळे केले तर,एअर टिकेट्स बुकिंग, चांगली गाडी,चांगला ड्रायव्हर  ,निवासासाठी उत्कृष्ट हॉटेल्स,भेटीची आवश्यक आणि निवडक ठिकाणे,खरेदीसाठी सल्ला आणि आमची कोठे फसवणूक होणार नाही याची दक्षता.


अनिता नेहमी म्हणते वाजवी किंमतीत दर्जेदार कपडे खरेदी करायला पारख लागते . अगदी तसच टूरच्या वाजवी किंमतीत उत्कृष्ट हॉटेल्स,कॉंटिनेंटल ब्रेकफास्ट, व्हेज,नॉनव्हेज,लोकल फूड द्यायला आकांक्षा सारखी पारखी एजन्सीअसली पाहिजे. 


खरंतर आम्हाला पुरविलेली हॉटेल्स,रिसॉर्ट्स इतके सोईसुविधा असलेले होते की त्यांचा लाभ घ्यायला वेळ पुरत नव्हता.

मुन्नार,थेक्कडीची ब्युटी इतकी सिनिक आहे की २२८ sq.kms विस्तीर्ण डोंगरांच्या रांगात हिरवागार गालिचा अंथरल्या सारखे चहाचे मळे बघून मन हरखून जाते. पेरियार आणि व्हेंबनाड राईड्स अनेक दिवस लक्षात राहतील.


कोची ते पूवार आयलंड रिसॉर्ट पर्यंतची हॉटेल्स चढत्या क्रमाने एकापेक्षा एक सरस होती. शेवटच्या दोन दिवसात भारत बंद आंदोलनामुळे आम्हाला कन्याकुमारी रद्द करावे लागले पण आम्ही पूवार रिसॉर्ट एन्जॉय केले.


निलेश मला म्हणाले होते की,"सर,तुम्ही माझे पहिले कस्टमर आहात, मला तुम्हाला एकदम चांगली सेवा द्यायची आहे.इतके सगळे नियोजन केले तरी प्रत्येक्षात काही ऊंनीस-बीस होऊ शकते. पण मी प्रामाणिकपणे चांगली सेवा देणार आहे."


केवळ माझ्या शब्दावर विश्वास ठेवून सर्वश्री गायकवाड आणि शेटे यांनी निलेशवर जो विश्वास ठेवला तो त्यांनी सार्थ ठरविला.


निलेश यापुढेही आलेल्या प्रत्येक ग्राहकास पहिला ग्राहक असे समजूनच सेवा दिली तर तुम्ही जिंकलात म्हणून समजा.


आमची केरळ टूर अविस्मरणीय केल्याबद्दल तुमचे मनापासून आभार!


योगीराज देवकर.

9403733901/9307133134

www.motivationacademy.in

चितळे फॅक्टरी

 मध्यंतरी श्री इंद्रनील चितळे यांनी क्लब सदस्यांना दिलेल्या निमंत्रणावरून चितळे फॅक्टरीला भेट देण्याचा योग आला. इथे प्रसिद्ध बाकरवडी आणि स्वीट्सचे आद्ययावत मशीनरी द्वारा उत्पादन केले जाते. चितळे घराण्यातील या युवा पिढीने हा उद्योग एका वेगळ्याच उंचीवर पोहचवीला आहे.महाराष्ट्रीयन उद्योजकाचा अभिमान वाटावा असे हे उदाहरण आहे.

प्रथम टेकनॉलॉजिज्

 World Class From India ही टॅग लाईन देशप्रेमासह मिरविणाऱ्या Pratham Technologies Pvt Ltd च्या श्री दत्ता देशपांडे आणि श्री संजय दांडेकर यांनी Entrepreneurs' International च्या सदस्यांना निमंत्रित केल्यामुळे या फॅक्टरी व्हिजिटचा योग आला. पेपर फोल्डिंग मशीनरी उत्पादन करणाऱ्या या कंपनीने जर्मनीच्या उत्पादकांवर मात करून जगभर स्वतःचा दबदबा निर्माण केला आहे. अनेक प्रगत,अप्रगत देशात मशीनरी निर्यात करून आणि USA मध्ये उद्योगाची मुहूर्तमेढ रोवून एक मेंचमार्क निर्माण केला आहे. दोन्ही उद्योजक मित्रांचे अभिनंदन आणि प्रगतीसाठी शुभेच्छा.

मालक नको पालक बना

 शनिवार 20 ऑगस्ट 22 रोजी म.टा.पुणे मध्ये रेणू गावस्कर मॅडमचा 'मालक नको, पालक व्हा', हा लेख पाहिला-वाचला आणि वंदन नगरकर आठवले.गावस्कर मॅडम नेहमीच फार साध्या, सोप्या,सरळ, समजावण्याच्या भाषेत लेख लिहतात त्यासाठी प्रथम त्यांचे अभिनंदन.

प्रसाद मिरासदार मुळे माझी वंदनशी ओळख झाली. पुढे ते वक्ता म्हणून आमच्या प्रशिक्षण कार्यक्रमात येऊ लागले .उत्सुकता म्हणून त्यांनी माझा सूर्य शिबीर येथे 'उद्योजकीय प्रेरणा प्रशिक्षण कार्यक्रमही',अटेंड केला.पुढे त्यांचे पुस्तक प्रकाशन असो, व्याख्यान असो त्यांची निमंत्रणे येऊ लागली .त्यांनी जेव्हा 'चला बोलूया जग जिंकूया', चा बालगंधर्वला पहिला प्रयोग केला तेव्हा मला परीक्षणासाठी बोलावले होते. वंदन म्हणजे सृजनशील,प्रयोगशील, स्पष्टवक्ता,विनोदी आणि खादाड माणूस.कुठं,काय चांगलं खायला-प्यायला मिळतं ते वंदनला विचारायचं.आज लेखात त्यांचा उल्लेख वाचून आनंद वाटला. प्रयोगशीलतेसाठी वंदनचेही अभिनंदन.

बैलगाडी आणि माझे बालपण

 बैलगाडी आणि बालपण.


5 मे 2021 रोजी अमेय आणि रुचिराचे लग्न झाले. त्यालग्नात  श्री.गिरीषराव रमेशराव गायकवाड आणि कुटुंबियांनी पदार्थांचा रुखवत केला होता त्यासोबत एक शोभेची बैलजोडी आणि बैलगाडी पुण्यातल्या घरात आली. मी मुळात शेतकऱ्याचा मुलगा आणि शेतकरी असल्यामुळे ही बैलगाडी दिसली कि,मला माझा गांव, शेती आणि बालपण आठवणे आगदी साहजिकच आहे.


लोणी देवकर या गावात माझा जन्म झाला आणि त्याच गावात बालपण पण गेले.चौथी पर्यंतची शाळा जीवन शिक्षण विद्या मंदिर, लोणी देवकर, पाचवी श्री नारायणदास रामदास हायस्कूल, इंदापूर. सहावी पासून पुण्याला असा शिक्षणाचा प्रवास झाला. माझे वडील स्व.हरिश्चंद्र ज्ञानदेव देवकर मोठे शेतकरी होते. आमची वस्ती शेतातच होती .शेतावर सालाने काम करणारे दहा -बारा शेतमजूर होते आणि त्यांचे कुटुंबीयपण आमच्या वस्तीवरच रहात असत.शेतावर गाय, बैल आणि म्हैस अशा पाळीव प्राण्यांचे मोठमोठे गोठे होते.उन्हाळ्यात सहा-सहा बैलांचे दोन नांगर शेतीची नांगरट करीत असत. म्हैसिंचे दूध भिगवणच्या हॉटेलला पाठविले जायचे.मेंढारांचा मोठा कळप होता आणि  मेंढ्यासाठी वाडगे पण होते. मेंढ्याच्या लोकरीची विक्री व्हायची. त्याकाळात वडिलांनी किमान चाळीस, पन्नास लहान मोठी जनावरे पाळलेली होती. त्यामुळे शेतीसाठी मुबलक शेणखत मिळायचे. वस्तीवर कोंबड्या, कुत्री,असल्यामुळे शेतीला स्वयंपूर्ण करणाऱ्या साऱ्या गोष्टी तिथेच होत्या. एका विहिरीवर दहा

अश्वशक्तीचे रस्टन इंजिन होते. इंजिन चालू केले कि त्याच्या सायलन्सरचा आवाज परिसरात सगळीकडे ऐकू यायचा. इंजिनाने विहिरीतून बाहेर काढलेले पाणी शेतात पिकांपर्यंत वाहून नेहण्यासाठी मोठ्या तालीवरुन पाट बनविलेले होते.एका विहिरीवर मोट असायची. त्याविहिरीवर मोटीसाठीचे वडवान, दगडी हौद, पाण्याचा पाट,धाव, आजही अस्तित्वात आहे.

त्याकाळात गावात बारा बलुतेदारी अस्तित्वात होती. सुतार शेतीला मशागतीसाठी लागणारी औत,कुळव,तीफण ,अशी अवजारे आणि बैलगाड्या बनवत असत.लोहार लोखंडी खुरपं,विळा,कुदळ,कुऱ्हाड, बनवायचे.आमच्या शेताच्या तालींवर भरपूर केकताडाची झाडे होती. मातंग समाजाचे लोक त्या केकताडापासून वाक बनवायचे आणि मग त्या वाकापासून काणी, कासरा, सोल, नाडा, दोरखंड बनवायचे. त्याकाळात गावात घिसाडी समाजाचे लोक यायचे, तेही शेतीसाठी लागणारी कुदळ, टिकाव,खोरं अशी लोखंडी हत्यारे बनवायचे तसेच बैलगाडीच्या चाकांना लोखंडी रिम बसवून द्यायचे.गावात शेती हाच प्रमुख व्यवसाय होता त्यामुळे आजूबाजूला सगळी असली शेतीचीच कामे होताना दिसत असत.


बालपणी माझे मित्र कोण तर वस्तीवरील शेतमजूरांची मुले आणि गावातली शाळेतली मुलं. आजूबाजूच्या या सगळ्या गोष्टींचा माझ्यावर प्रभाव होता.त्यातच मी बागायतदारचं पोर,मोठे भाऊ श्री.कालिदास देवकर सरपंच असायचे त्यामुळे मित्रांत आणि शाळेत माझा रुबाब असायचा.

बालपणी आमचे खेळ काय असायचे तर शेतात आम्ही जे बघायचो त्याची प्रतिकृती आम्ही अंगणात तयार करायचो. विहीर खोदायचो , त्यात पाणी भरायचो ,मोट किंवा कधी चिखलाचे इंजिन तयार करायचो, त्याला कांद्याच्या रोपाला जे बियाण्यांचे शुटआउट येतात त्याचे पाईप वापरून आमच्या छोटेखानी शेताला पाणी द्यायचो.

ज्वारीचा कडबा असतो त्याच्या चिपाडापासून मी अगदी हुबेहून खेळण्यातली बैलगाडी आणि शेतीची अवजारे बनवायचो.

चिखलापासून बैलजोडी बनवायचो आणि मग आमचा बैलगाडीचा खेळ चालायचा.

माझ्यापेक्षा मोठा भाऊ श्री.रत्नकवी देवकर यांनी मला पोहायला शिकवायचा प्रयत्न केला. एक बारव होती तिथे पाठीला पोहरा बांधून मला पोहायला शिकवायचे प्रयोग झाले. तेव्हा मला ते काही जमले नाही. पुढे काही कालावधीनंतर माझ्या वडिलांनी एक नवी विहीर खोदली.आमचा एक शेतमजूर त्याविहिरीत रोज पोहायला जायचा. मी ते रोज पहायला जायचो. मला शिकायचे होते म्हणून त्याचे निरीक्षण करायचो. एक दिवस धाडस करून मीच त्या मजुराला म्हणालो, मला पण पोहायचे आहे. त्याने विचारले पोहायला येते का? मी हो म्हटलं पण त्याला लक्ष द्यायला सांगितले आणि मग काय उतरलो विहिरीत आणि आश्चर्य म्हणजे मला पोहायला जमले. यात मला जे थोडेफार शिकवले होते, माझे निरीक्षण आणि माझा विश्वास याचा वाटा असावा असे वाटले. मग काय पुढचे अनेक दिवस मी त्या मजूरासोबत पोहायला जात होतो .

त्याकाळात शेतावर कडुनिंब, रामकट, बाभूळ अशी खुप झाडे होती. गावातल्या एका मित्रामुळे मला या झाडांवरचे सरडे विनाकारण दगडांनी मारायची खोडकर सवय लागली होती. सरड्याने जर आम्हाला पाहिले तर तो पळ न काढता उलट तसाच झाडाच्या बुंद्यावर थांबत असे. माझा दगड मारण्याचा नेम फार चांगला होता. त्यामुळे स्थिर उभा राहिलेला सरडा मी एकाच दगडात मारत असे.पुढे समज आल्यावर समजले कि,केवळ स्वतःची नेमबाजी दाखविण्यासाठी मी करत ती एक चूक होती याची नंतर खंत मात्र वाटत राहिली. पण या दगडाच्या नेमबाजीचा मला एकदा चांगलाच फायदा झाला. मी तिसरी किंवा चौथीत असेल, काहीतरी कामासाठी विहिरीकडे गेलो होतो. जवळच्या गवतातून चालताना अचानक एक नाग फना काढून माझ्या समोर उभा राहिला. एक इंच जाडीचा तर नक्की होता तो . मी घाबरून पळालो. 10-15 फुटावर जाऊन उभे राहून पाहिले तर तो नाग तसाच फना  काढून उभा होता.मी एक दगड घेतला आणि जोरात त्या नागाच्या दिशेने मारला. तो नेम इतका बरोबर होता तो फटफा नेमका त्याच्या उघडलेल्या फन्यावरच बसला आणि एकाच फटक्याक त्या नागाचा मृत्यू झाला. तेव्हा मला मी शूर आहे असे वाटले होते.झाडांवरचा डिंक  गोळा करायची एक चांगली सवय मला लागली होती.स्व.हिराबाई माझ्या आईचे नाव पण तिला सगळे भाभी म्हणत असत.मिळालेला डिंक मी आई कडे देत असे.

आमच्या गावातल्या शाळेच्या मैदानात ओळीने वडाची झाडे होती, त्यावर आम्ही सुरपारुंब्या हा खेळ खेळायचो.झाडाच्या फांद्या पारुंब्या वरून आम्ही वानरासारखे खेळत असू.

चीर चीर घोडी हा आमचा अजून एक खेळ, तो तर आम्ही पाचवीत इंदापूर हायस्कूल मध्ये पण खेळत असू .

विटी-दांडू,गोट्या,लगोरी हे खेळ तर होतेच पण 

घरातले लोक आंबे खावून कोया शेणाच्या उकिरड्यावर टाकायचे, पाऊस पडला कि त्यापासून आंब्याची रोपे उगवायची.ही रोपे ज्या तालीवरून पाण्याचा पाट वाहत असे त्या तालीवर नेहून लावणे हा अजून एक खेळ. तालीच्या उतारावर व्यवस्थित खड्डा करून त्यात रोप लावायचे, आळे तयार करायचे, त्याची पाण्याची सोय करायची. हे सगळे करण्यात आम्ही शेतीचे काहीतरी काम करतोय ही भावना पण असायची.

त्याकाळात आमच्याकडे एक बुलेट मोटारसायकल होती आणि शेतात बैलगाडी हेच वाहतुकीचे एक साधन होते.महिलांना गावात जायचे यायचे असो ,शेतमाल,शेणखत वाहतूक असो ती बैलगाडीनेच होत असे.त्यामुळे कोणत्याही कारणासाठी बैल गाडीला झुंपले कि आम्ही त्यागाडीत बसायला पळायचो. फार मजा होती बालपणी.

सध्या हे सगळे आठवण्याचे कारण म्हणजे पुण्यातल्या घरात दररोज दिसणारी रुचिरा सोबत आलेली बैलजोडी आणि बैलगाडी.

धन्यवाद.

योगीराज देवकर.

www.motivationacademy.in

चला उद्योजक घडवूया

 चला उद्योगी,मेहनती माणसं घडवूया!


वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ कोऑप्रेटीव्ह मॅनेजमेंट मध्ये MCED च्या कार्यक्रमात तीन दिवस वक्ता म्हणून गेली होतो.रोज सकाळी 9.30 ते संध्याकाळी 6.00 पर्यंत चहा आणि जेवणाचा वेळ वगळता कार्यक्रम सुरु राहिला. आजकालच्या कार्यक्रमात Science & Technology चे भरपूर प्रशिक्षणार्थी असतात. हुशार ट्रेनि सोबत कार्यक्रम करायला फार मजा येते. समारोपाच्या वेळी माझे मित्र श्री एस एस सुरवसे साहेब,उद्योग सह संचालक, पुणे विभाग आणि MCED चे श्री सुदाम थोटे, RO आणि अधिकारी उपस्थित होते. एखाद्या विषयाचे Wisdom आले कि कार्यक्रम प्रभावी होतोच हे ट्रेनिंच्या फीडबॅक वरून जाणवले.

ग्रेट भेट - आण्णा हजारे

 23 जून 2022 रोजी आदरणीय श्री आण्णा हजारे यांची राळेगण मध्ये भेट झाली. हॉल मध्ये येताच मी त्यांच्या पाया पडलो.आरे नको नको, राहूद्या , म्हणून त्यांनी बोलायला सुरुवात केली. काय देवकर साहेब खूप दिवसांनी येणं केलंत. मी जेव्हा जेव्हा सोलापूरला गेलो तेव्हा तेव्हा लोणी देवकर गाव दिसले कि मी सोबतच्या कार्यकर्त्यांना सांगायचो,आपले देवकर साहेब या गावचे आहेत. या गावात माझा कार्यक्रम झाला आहे. मी एकदम आश्चर्यचकित झालो,मी म्हटले आण्णा, साध्या माणसाला पण तुम्ही किती लक्षात ठेवले आहे .


मी आण्णांच्या प्रकृतिची चौकशी केली, तर ते म्हणाले, पाठीचे दुखणे त्रास देत आहे. पायाच्या शिरा दुखतात,डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. मी म्हणालो, आण्णा,तुम्हाला लाखो लोकांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद आहेत, संत तुकाराम, ज्ञानेश्वर, विठ्ठलाचे आशीर्वाद आहेत, तुम्हाला काही होणार नाही. तुम्ही Self realize व्यक्ती आहात. डॉक्टरांचे उपचार तर घ्याच पण सद्या वेळ आहेच तर लक्ष टाळुवार ठेऊन ध्यान करत जा. तुम्हाला आराम मिळेल. आण्णा सांगत होते कि, सध्या 85 वय चालू आहे. दोन किलोमीटर चालतो, प्राणायाम, योगा करतो, वाचन, पत्र व्यवहार करतो. मी फार आनंदी आणि समाधानी आहे. आयुष्यात मी काही तत्व पाळली आहेत, निष्कलंक जीवन जगायचे,स्वतःला कसला डाग लागू द्यायचा नाही,बँक बॅलन्स करायचा नाही,

पैशाचा मोह ठेवायचा नाही,सत्ता मिळवायची नाही,समजसेवेसाठी नेहमी त्याग करायचा,मोह ठेवायचा नाही,40 वर्ष झाली, समाजसेवेसाठी जसं घर सोडलंय तसं पुन्हा घरी गेलो नाही, पुतण्यांची नावं सुद्धा लक्षात नाहीत.

म्हणूनतर लोकांची साथ मिळाली आणि इतके मोठे काम करता आले.

मी म्हटले,आण्णा तुम्ही फार मोठा आदर्श निर्माण केला आहे. माझ्यासारखे लाखो लोक आहेत जे तुम्हाला फॉलो करतात.


आण्णांना बरे नसताना देखील त्यांनी गप्पासाठी बराच वेळ दिला. त्यांच्याशी बोलून नेहमीच छान वाटते.


मी म्हटले, आण्णा, माझ्या ट्रेनिंग मध्ये 40 प्रशिक्षनार्थी आहेत, त्यांनाही तुम्हाला भेटून फोटो घ्यायचा आहे.ते यासाठीही तयार झाले. बाहेर येताच त्यांनी सर्वांना विचारले,तुम्ही सगळे उद्याचे उद्योजक आहात,असे मी समजू का? सगळे हो म्हणाले. मग आण्णांनी त्यांना पण उद्योजक झाल्यावर कसे समाजउपयोगी जीवन जगावे असा सल्ला दिला.


कृषी महाविद्यालयाच्या आवारात सावंत आयोगाचे कामकाज(सुरेश जैन विरुद्ध आण्णा हजारे खटला )चालू होते तेव्हा माझे भाग्य कि आण्णा आमच्या तत्कालीन कार्यालयात दुपारचे जेवण करायला बसण्यासाठी येत असत.तेव्हा आम्हाला अण्णांची थोडीफार सेवा करायची संधी मिळाली.


आपले किती मोठे भाग्य आहे कि, आपल्या महाराष्ट्रात अशी अनेक आदर्श व्यक्तिमत्व आहेत ज्यांच्यामुळे समाज योग्य प्रकारे वाटचाल करीत आहे.

My Motivation Academy

 प्रेरणा विकसित करणारी मोटिवेशन अकॅडेमी.


माणसांची वर्तणूक,प्रेरणा, प्रवृत्ती या विषयी संशोधन करणाऱ्या मानसशास्त्रज्ञाना एक मूलभूत प्रश्न पडला होता, तो म्हणजे,'Why people do what they do?' या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात माणसांच्या प्रेरणा, प्रवृत्ती वरती पुष्कळ प्रमाणात प्रकाश पडलेला आहे. तुम्ही जे काय करत आहात ते का करत आहात ?  हाच प्रश्न तुम्ही स्वतःला पण विचारा म्हणजे तुम्हालाही तुमच्या प्रयत्नाचे कारण समजू शकेल.


Motivation,प्रेरणा म्हणजे काय तर To move याचा अर्थ हालणे, प्रवृत्त होणे, धडपड करणे, प्रयत्न करणे. मोटिवेशन हे दोन क्षेत्राशी संबंधित आहे. एक- स्वतःला प्रेरित करणे आणि दोन - इतरांना प्रेरित करणे. प्रेरणेची एक पूर्वअट असते ती म्हणजे माणसाचे निश्चित व्हिजन,मिशन,उद्देश,ध्येय, धोरण असे काहीतरी स्पष्ट असायला पाहिजे म्हणजे या हालचालीला एक निश्चित दिशा मिळू शकते. प्रेरणा, ध्येय असले तरी याच्या संदर्भात सर्वच हेतू, उद्देश, गरजा सारख्याच महत्वाच्या, उपयुक्त असतील असे सांगता येत नाही, काही बिगरउपयुक्त पण असू शकतात. त्यामुळे प्रेरणेत ध्येयाबरोबरच अजून एक घटक महत्वाचा ठरतो तो म्हणजे Need,गरज. म्हणजेच गरज असेल तरच माणूस हालचाल करायला प्रवृत्त होतो अन्यथा नाही.


माणसाला दोन प्रकारच्या गरजा असतात. एक - जिवशास्त्रीय किंवा भौतिक गरजा आणि दोन - मानसिक गरजा. मॅस्लो या मानसशास्त्रज्ञाने गरजांची जी थिअरी मांडली त्यात त्याने माणसाच्या मूलभूत गरजा, शारीरिक,आर्थिक सुरक्षितेच्या भौतिक गरजा सोडल्या तर उरलेल्या मानसिक, भावनिक सुरक्षिततेच्या गरजा , सहवास आणि प्रेमाची गरज, आदर आणि प्रतिष्ठा याची गरज,आदराच्या गरजेतही तो दोन भाग करतो. एक- आदराची खालची पातळी आणि दोन -आदराची वरची पातळी.आदराची वरची पातळी म्हणजे स्वतःचा सन्मान वाढेल, आत्मसन्मान वाढेल अशी वर्तणूक. मॅस्लोने वरच्या पातळीवरील जी गरज सांगितली आहे तिला तो बिईंग नीड असे म्हणतो. म्हणजे माणूस म्हणून विकसित व्हायची,समृद्ध व्हायची गरज किंवा 

आत्मविष्काराची गरज.

तुम्ही जर का भौतिक गरजा पूर्ण करण्याइतपतच हालचाल करणार असाल तर तुमची प्रगती मर्यादित होते पण तुम्ही जर मानसिक गरजा पूर्ण करण्यासाठी धडपड करत असाल तर तुमची प्रगती अमर्याद होणार.

खरंतर पाच सहा प्रकारच्या महत्वाच्या मानसिक गरजा सांगितल्या जातात परंतु इथे आपण एकच मानसिक गरज पाहूया.

एक्सेल ची गरज - सेल्फ एक्सेल, सेल्फ एस्टिम, सेल्फ ऍक्च्युअलायझेशन ही मानवाची सर्वोत्तम मानसिक गरज समजली जाते.ही गरज आढळणाऱ्या व्यक्तीला सिद्धिप्रेरित समजले जाते.मानवाने आज जी प्रगती केली आहे ती याच गरजेच्यापूर्ततेसाठी केलेली आहे.नीड फॉर सेल्फ एक्सेल म्हणजे काय तर स्वतःमध्ये वाढ करणे, स्वतः श्रेष्ठ असणे आणि तसे काहीतरी करणे , जे कराल त्याकामात भर घालणे, सुधारणा करणे, सतत उत्तम करण्याचा प्रयत्न करणे. कोणतेही काम मग ते तुम्ही पुन्हा पुन्हा करत असाल ते असो किंवा पहिल्यांदाच करत असाल ते असो ते सरसच व्हायला पाहिजे, उत्तमच व्हायला पाहिजे,ही मानसिक गरज असणे .

केवळ एक्सेल या गरजेच्या अनुषंगाने जगाच्या पाठीवर औद्योगिक विश्वात किती मोठे काम झाले आहे ते पहा. गुणवत्तापूर्ण वातावरणासाठी फाईव्ह एस, क्वालिटी सर्कल, लीन मॅनेजमेंट, जस्ट-इन -टाइम, टि क्यू एम, कायझेन,आयएसओ,असे किमान वीस पंचवीस तरी टूल्स पहायला मिळतील .

मला असे काही उद्योग, संस्था माहित आहेत ज्यांच्याकडे ISO प्रमाणपत्र आहे पण त्यांचा कारभार मुळीच क्वालिटी चाललेला नाही.याउलट एखाद्या संस्थेकडे असे मानक प्रमाणपत्र नसते परंतु तिथले लोक इतकी चांगली सेवा देतात कि आपल्यालाही आश्चर्य वाटते. ते कशामुळे तर कामगार, कर्मचारी, अधिकारी यांच्यामधील नीड फॉर एक्सेल या मानसिकतेमुळे.अशी मानसिक गरज जर स्वभावाचा भाग असेल तर अशा व्यक्तीला तू काम नीट कर हे सांगावे पण लागत नाही.

Fear,भीती आणि hope, आशा हे प्रेरणेचे दोन स्रोत आहेत. स्वभावात एक्सेलचे प्रमाण कमी असेल तर माणूस भीतीच्या छायेत वावरतो आणि स्वभावात एक्सेलचे प्रमाण जास्त असेल तर माणसाला यशाची आशा,आकांक्षा, महत्वाकांक्षा असते. आज आपल्याला अशाच प्रेरित, सकारात्मक, रचनात्मक, उत्पादक माणसांची गरज आहे.

माझी मोटिवेशन अकॅडेमी अगदी अशाच प्रकारची उद्योगी, मेहनती व्यक्तिमत्व विकासाचे कार्य करते.

औद्योगिक विश्वात कार्यरत कामगार, कर्मचारी, अधिकारी आणि उद्योजकांना Entrepreneurs day आणि भारतरत्न जे आर डी टाटा यांच्या वाढदिवस दिनाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा.


योगीराज देवकर.

लेखक, प्रेरक, प्रशिक्षक.

www.motivationacademy.in

महेश अमोणकर गोवा

 Regent Metal Tech & Rainbow Engineering at Kundaim-Goa.

माझे मित्र श्री महेश अमोणकर यांच्या दोन्ही फॅक्टरीज् ला भेट देण्याचा योग आला. इथे Powder Coating  चे काम केले जाते. प्रामुख्याने Crompton चे पंखे आणि संबंधित उत्पादनांचे पावडर कोटिंग केले जाते. या उद्योगास आता जवळपास पस्तीस वर्षें पूर्ण झाली आहेत. सदर तंत्रज्ञान तसे परिचित आहे परंतु हे दोन्ही युनिट्स क्वालिटी जॉब वर्कसाठी प्रसिद्ध आहेत. युनिट्स मधील काही कामगार तर अगदी पहिल्या दिवसापासून इथे काम करीत आहेत हे बघून मला थेअरी 'Z ' ची आठवण झाली. कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळच '5 S ' चे महत्व विषद केलेले आहे.कुंडईम इंडस्ट्रियल इस्टेट टेकडीवर आहे त्यामुळे निसर्गरम्य वातावरण आणि नजर जाईल तिथपर्यंत मांडवी नदीचे पात्र आणि खाडीचा भाग दिसतो.गोव्यात कोणाला पावडर कोटिंग ची सुविधा हवी असेल तर तुम्ही हे नाव विश्वासाने रेफेर करू शकता.

www.motivationacademy.in

गोवा आणि फिश

 गोवा आणि फिश


ओल्ड गोवा मध्ये श्री आनंद नाईक यांचे स्टार रेस्टॉरंट आहे.पणजी-जुना फोंडा रोडवर 8-10 मिनिटांच्या ड्राईव्हवर जवळची मोठी खूण म्हणजे सेंट ऍंथोनी चर्च किंवा रामदास सॉ मिल . माझ्या गोव्यातल्या मित्राचा हा मित्र आहे. हॉटेलच्या नावात स्टार आहे या नावाला साजेशाच इथल्या फिशच्या डिशेस चवदार असतात.मी पणजीला आलो कि इथे जेवायला जाणे होतेच. बिना काट्यांचा चाणक मासा ,छोट्या प्रॉन्स पासून किंग्ज प्रॉन्स पर्यंतचे प्रॉन्स मासे , सुरमई मासा,अशा कितीतरी एकापेक्षा एक चविष्ठ आणि सरस डिशेस तिथे मिळतात.रेस्टॉरंट म्हणाल तर एक छोटसं जुनं कौलारु बांधकाम, आजूबाजूला झाडी आणि बाहेर मोकळ्या जागेत बसायला लावलेल्या खुर्च्या आणि टेबल्स हा अवतार पाहुन एखाद्याला जेवणाच्या दर्जाबद्दल शंका येईल पण वर्षानुवर्षे चांगली क्वालिटी आणि सेवा देऊन त्यांनी मोठा ग्राहकवर्ग निर्माण केला आहे.एकदा गेलेला ग्राहक ऍम्बीयन्स नाही तर क्वालिटीसाठी तिथे जातो.तुम्ही पण,पण कशाला,पणजीला याल तेव्हा फिश खाण्यासाठी इथे भेट द्यायाचे ठरवू शकता.


स्टार रेस्टॉरंट

9822382944

7798354856

शरद काळे यांचा लोणी देवकर येथे सत्कार.

 विक्रमवीर शरद काळे पाटील यांचा लोणी देवकर येथे सत्कार.

लोणी देवकर-(12 नोव्हेंबर 2022)- आज शरद काळे पाटील पुणे-इंदापूर -पुणे 300 कि.मी.अंतर सायकल वरून 20 तासात पूर्ण करण्यासाठी हायवे वरून जात असताना लोणी देवकरचे सरपंच कालिदास देवकर यांच्या हस्ते त्यांचा पाहुणचार आणि सत्कार करण्यात आला.

वय हा केवळ एक आकडा आहे हे अहमदनगर मधील सोनाई गावचे सुपुत्र शरद काळे पाटील यांनी त्यांच्या कर्तृत्वाने सिद्ध केले आहे. खरंतर ते एक उद्योजक आहेत.वयाच्या पन्नासाव्या वर्षी त्यांनी आयर्नमॅन होण्याचे स्वप्न पाहिले आणि पोहायला शिकण्यापासून सुरुवात केली. पोहणे, धावणे आणि सायकल चालवीण्याचा सराव सुरु झाला.आज वयाच्या 56 व्या वर्षी त्यांच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद झाली आहे.तब्बल आठ वेळा एस आर स्पर्धा(200,300,400,600कि.मि.सायकल स्पर्धा.)पूर्ण करणारे महाराष्ट्रातील ते पहिले सायकल वीर आहेत.

औरंगाबाद येथे 1000 कि. मि.बीआरएम स्पर्धा 68 तास 10 मिनिटात पूर्ण.

पुणे 1200 कि.मि. स्पर्धा 79 तास 37 मिनिटात पूर्ण.

इंग्लंड येथे आयोजित लंडन-इडनबर्ग-लंडन 1540 कि.मि. अंतर 128 तासात पूर्ण.

ते एक नावाजलेले मोटरसायकल वीरही आहेत.त्यांचे नाव लिमका बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये दोनदा नोंदले गेले आहे.

मोटारसायकल वरून महाराष्ट्रातील अष्ठविनायक 12 तास 12 मिनिटात पूर्ण. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे 25 तासात पूर्ण.

भारतातील सुवर्ण चातुस्कोन म्हणजे मुंबई-दिल्ली-कोलकता-चेन्नई-मुंबई 5847 कि.मि. अंतर फक्त 88 तासात पूर्ण केले.

लोणी देवकर मधील योगीराज देवकर यांचे ते मित्र आहेत. सत्कार समारंभास सर्वश्री इंदापूर कारखान्याचे डायरेक्टर रत्नकवी देवकर,सहदेव डोंगरे,दादासाहेब तोरवे, सचिन घाडगे, दिलावर तांबोळी, पप्पू घाडगे, धनंजय चव्हाण, कुंडलिक घाडगे, पांडुरंग राखुन्नडे, नानासाहेब देवकर, अमोल देवकर,तुळशीराम घाडगे, साईराज देवकर, पत्रकार संदीप बल्लाळ आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

राळेगण, गावाचा वाढदिवस.

 महाराष्ट्रातील सर्व खेड्यांनी राबवावी अशी स्तुत्य संकल्पना - गावाचा वाढदिवस.


राळेगण सिद्धी-ग्रामपरिवर्तन दिवस.


एकदा गावाकऱ्यांनी आण्णा हजारे यांचा वाढदिवस साजरा करायचे ठरविले होते. तेव्हा आण्णांनी स्वतःचा वाढदिवस साजरा करण्याऐवजी गावाचा वाढदिवस साजरा करूया अशी संकल्पना मांडली. आणि मग 2 ऑक्टोबर हा दिवस ठरविण्यात आला.राळेगण मधील या उपक्रमाला आता वीस वर्ष झाली आहेत. यावर्षी अतीवृष्टी मुळे तो दिवस 19 नोव्हेंबर रोजी साजरा झाला. योगायोगाने त्याच दिवशी आण्णांच्या मातोश्री कै.लक्ष्मीबाई हजारे यांचा स्मृती दिनही होता.


दिवसभर रक्तदान शिबीर आणि पद्मश्री डॉ तात्यासाहेब लहाने यांच्या उपस्थितीत मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर पार पडले.


विशेष म्हणजे यादिवशी गावात संध्याकाळी चूल बंद असते आणि सगळ्या ग्रामस्थ आणि उपस्थितांना भोजन दिले जाते, ज्याचा खर्च आण्णा हजारेंच्या पेंशनच्या पैशातून केला जातो. या अभिनव उपक्रमात खालील कल्पना राबविण्यात येतात.

1)ग्राममाता आणि ग्रामपिता चरण पूजन आणि सन्मान- गावात ज्या पुरुषाचे आणि ज्या महिलेचे वय जास्त आहे अशा दोन व्यक्तीची दरवर्षी निवड  केली जाते आणि त्यांचे ग्रामपिता आणि ग्राममाता म्हणून आण्णांच्या आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते चरणपूजा करून सन्मान केला जातो.याचा उद्धेश असा आहे कि,गावातील लहान,थोरांना जेष्ठ नागरिकांच्या योगदानाची जाणीव असावी आणि त्यांचा नेहमी आदर केला जावा.

2) गतवर्षात गावात जन्मलेल्या बालकांचा सन्मान - गतवर्षात गावात जी बालके जन्माला आलेली आहेत त्यांचा गावाच्या वतीने अंगडं, टोपडं देऊन सन्मान केला जातो .एकप्रकारे हा मातांचाही सन्मान केल्यासारखेच आहे.याचा उद्धेश असा आहे कि,मुले ही गावाची, देशाची संम्पत्ती आहेत. सन्मानाने गावात त्यांचे स्वागत केले जाते.

3) गतवर्षात गावात ज्या सुना आलेल्या त्यांचा गावाच्या वतीने साडी चोळी देऊन ओटीभरण आणि सन्मान करणे - याचा उद्धेश असा आहे कि,सुन घरात आल्यानंतर तिला जसे घराण्यातील चाळीरिती समजाव्यात,परंपरा आणि संस्कृती कळावी असे वाटते तसेच तिला गावाचा इतिहास आणि संस्कृती कळावी.तिच्या सर्वांशी ओळखी व्हाव्यात.ती गावाची सुन आहे.

4) कर्तृत्ववान नागरिकांचा सत्कार - गावातील ज्या नागरिकांनी ते जिथे असतील तिथे गतवर्षात जर काही विशेष कामगिरी गेली असेल त्यांचा सत्कार केला जातो. याचा उद्धेश असा आहे कि, हे नागरिक गावाचे भूषण आहेत, ते गावाचे नाव मोठं करीत आहेत त्यांची उचित दखल घेणे.यात उद्योजक, अधिकारी,शहरातील नोकरी सोडून गावात परत येऊन शेती करणारा शेतकरी, आधुनिक पद्धतीने शेती करणारा शेतकरी, दूध व्यावसायिक, मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळविलेले विद्यार्थी, सैन्यदलात प्रवेश करण्याचे मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक, गावाची वेगवेगळ्या पद्धतीने सेवा करणारे नागरिक,इ. असे अनेकजण होते.


मी 18 ते 20 नोव्हेंबर दरम्यान ट्रेनिंगच्या निमित्ताने राळेगण मधेच होतो त्यामुळे या उपक्रमास उपस्थित राहण्याचा योग आला. मला मनापासून असे वाटते कि महाराष्ट्रातील इतर गावांनीही या संकल्पनेचे अनुकरण करावे.


योगीराज देवकर.

www.motivationacademy.in

हॉटेल चुल मटण

 हॉटेल चुल मटण - नॉस्टॉजिक अनुभव.


हॉटेल चुल मटणची तिसरी शाखा बालगंधर्व चौक,

नॅचरल आईस्क्रीमच्या मागे, जंगली महाराज रोडवर सुरु झालेली आहे. पूर्वीच्या दोन शाखा डी पी रोड म्हात्रे पुल आणि केशवनगर पिंपळे-सौदागर या अगोदरच चोखंदळ ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या आहेत. 


शहरात राहणाऱ्या बहुतेक लोकांना ग्रामीण पार्श्वभूमी  असते. चुलीवरच्या ज्वारी आणि बाजरीच्या फुगलेल्या भाकरी,घरगुती चिकन,

मटण,लाल,काळ्या मसाल्यातील रस्सा ,अळणी चिकन आणि मटण (सुप ), निखाऱ्यावर भाजलेली कलेजी, घडीच्या चपात्या,बुक्की मारून कांदा फोडणे, इ. गोष्टी अनेकांच्या मनात घर करून असतात.

यामुळेच लोकांना हॉटेल मध्ये जाऊनही घरच्या स्वादाचा अनुभव देणारे फूड आवडते.


हॉटेल चुल मटणने याच नॉस्टॉजिक अनुभवाला अधूनीकतेची जोड दिली आहे.त्यामुळेच हॉटेल चुल मटणचा मेनू  शहरी आणि ग्रामीण सगळ्याच लोकांच्या आवडीचा झालेला आहे.


एकदा खाल तर पुन्हा पुन्हा जाल!


शुभेच्छुक.

योगीराज देवकर.

www.motivationacademy.in

वर्गमित्र मेळावा औरंगाबाद

 ऊर्जादायी जुनी मैत्री.

श्री नारायणदास रामदास हायस्कूल इंदापूर सन 1972 ते 1978 च्या पाचवीच्या पहिल्यावहिल्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे गेटटुगेदर 13 फेब्रुवारी 2013 ला झाले होते. तब्बल 35 वर्षांनी एकावेळी सगळे एकमेकांना भेटत होते.फारच भावुक आणि नॉस्टालजिक दिवस होता तो. गेटटुगेदरची कल्पना सुचल्यानंतर गणेश देशपांडे,सत्यजित गुजर , प्रदीप गारटकर, घनश्याम शहा,पांडुरंग राऊत सगळ्यांनी मनावरच घेतलं होतं की, वर्गातल्या सगळ्यांना जिथं कुठं असतील तिथून शोधून काढायचे. सत्तरच्या दशकात ज्यांचे आई-वडील उजनी धरण प्रकल्पच्या नोकरीत होते ती मुलं,मुली औरंगाबाद,मुंबई,

हैद्राबाद, बेळगाव अशा ठिकाणी गेली होती,नोकरी निमित्त काहीजण पुण्यामुंबईत होते,तर मुली लग्न होऊन कुठे कुठे सासरी गेल्या होत्या. मुख्याध्यापक,शिक्षक, शिक्षिका निवृत्त झाले होते आणि त्यातले काही इंदापूर तर काही इतरत्र स्थायिक झाले होते. पण या मित्रांनी सगळ्यांना शोधून काढलेच आणि आमचे गेटटुगेदर जोशात पार पडले. खरंतर मी फक्त पाचवीला एकच वर्ष इंदापूरला होतो.माझं पुढचं सगळं शिक्षण पुण्यात झाले. इथे नवीन मित्रवर्ग निर्माण झाला. पण जुनं ते सोनं या म्हणीप्रमाणे बालपणीच्या मित्रांचे खास वेगळेच स्थान असते. गेटटुगेदरचा सगळ्यात मोठा फायदा हा झाला की आमचा 'मधली सुट्टी ' या आगळ्यावेगळ्या नावाचा व्हाट्सअप ग्रुप तयार झाला. पुढे सत्यजित गुजरने थेऊरला आणि प्रमिला जाधवने कुंभरगाव -भिगवणला गेटटुगेदर ऑर्गनाईज केले होते. तेव्हा आयोजकांच्या यथायोग्य आदरातिथ्य आणि पाहुणचारासोबत थेऊरच्या गणपतीच्या दर्शनाचा आणि कुंभरगावला उजनी जलाशयात फ्लेमिंगो पक्षी निरीक्षणचा आनंद घेतला होता.


मध्यंतरी मित्र -मैत्रिणींच्या मुला -मुलींची लग्न झाली तेव्हा या भेटीगाठी होत राहिल्या.


21 आणि 22 जानेवारी 2023 ला म्हणजे नुकतच आमचं पहिलं निवासी गेटटुगेदर औरंगाबादला साजरे झाले. आयोजनाची पूर्ण जबाबदारी सत्यजित व स्वाती गुजर आणि डॉ सविता व डॉ मिलिंद पटवर्धन या उभायतांनी घेतली होती.


20 जानेवारीला रात्रीच नियोजनानुसार तिसजण औरंगाबादला पोहोचले. सत्यजित गुजर हा सध्या औरंगाबाद विभागाचा मुख्य वन संरक्षक आहे. त्याने गेस्टहाऊस आणि बंगल्यात सर्वांची निवासाची सोय केली होती. सकाळी नाष्ट्यापासून ते रात्री भोजनापर्यंत खानसामा दिमतीला होता. मग काय ग्रुपच्या गप्पा आणि मज्जा .


पहिल्या दिवशी सकाळी आम्ही घृषणेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेलो होतो . स्वागताला वन विभागाचे अधिकारी हजर होते. सरळ सगळे मंदिराच्या कार्यालयात गेलो.  मंदिराच्या अधिकाऱ्यांनी सगळ्यांची प्राधान्याने दर्शनाची सोय केली. शनिवार,गर्दी असूनही आम्हाला महादेवाचे व्हीआयपी दर्शन घडले. त्यानंतर वेरूळ लेणी पाहण्यासाठी गेलो. तिथं गाईड कचरू जाधव आमची वाट पहात उभा होता. त्यांच्या विनोदी, हजरजबाबी आणि तितक्याच अभ्यासपूर्ण मार्गदर्शनाखाली आम्ही कैलास लेणी पाहण्याचा आनंद लुटला. तिथून चालतच आम्ही महादेव वनात गेलो. बारा जोतिर्लिंगापैकी पाच जोतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत. युती सरकारने प्रत्येक जोतिर्लिंगाच्या ठिकाणी महादेवाला आवडणाऱ्या वृक्षांचे वन निर्माण करण्याचा निर्णय घेतला होता. घृषणेश्वर मंदिर परीसरात सदर महादेव वन निर्माण करण्यात आरएफओ सत्यजित गुजरचे मोठे योगदान आहे. साडेबारा एकरात फुललेल्या नंदनवनात विविध प्रकारचे बेल,रुद्राक्ष,चाफा,अर्जुन सादळा अशा अनेक प्रकारचे वृक्ष पाहताना 

सगळ्यांनाच सत्यजितचा अभिमान वाटत होता. औरंगाबादला परतलो तेव्हा दुपारचे तीन वाजले होते. जेवणानंतर तासाभराच्या आंतराने हुरडापार्टी सुरु झाली. एरवी कृषी पर्यटनात हुरडा पार्टी करणारी टीमच सत्यजितने कामाला लावली होती. हुरड्याच्या सोबतीला तीन प्रकारच्या चटण्या आणि आकटीत भाजलेली बेबी कॉर्नची चविष्ठ कणसे पण होती. आकटीच्या शेजारीच लॉनवर गोलाकार खुर्च्या मांडून बसलो मग काय योगीराज देवकरने मनोरंजक खेळांनी सुरुवात केली.सत्यजित गुजरच्या ऍक्टिव्हिटीज् नी सर्वांची मने जिंकली.गणेश देशपांडेने तर तो बॅचलर असताना सत्यजित आणि सविताने त्याला लिहलेल्या पत्रांचे वाचन करून मैत्रीच्या खोलीला उजाळा दिला. मग सविताने पण तिच्याकडील पत्रांचा खजिना काढला आणि काही शिक्षकांची पत्रे वाचून दाखविण्याची विनंती सत्यजितला केली कारण तिला स्वतःला फारच गहिवरून आले होते .श्रीकांत जोशीने बहारदार गायन करून अजूनही मी स्कूल मध्ये होतो तसाच छान गाणी गातो याची प्रचिती दिली. खरी मजा आणली ती पांडुरंग आणि पुष्पा राऊत या पती-पत्नीच्या विनोदांच्या जुगल बंदीने. बालपणीच्या कविता गायन, गाण्याच्या भेंड्या, पासिंग दी बॉल आणि शिक्षा सारख्या खेळांनी रात्रीचे नऊ कधी वाजले ते समजले नाही. हुरड्यानंतर मग रात्री नावाला जेवण आणि भरपेट गप्पा झाल्या.


दुसऱ्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता आम्ही दौलताबाद किल्याच्या पार्किंगला होतो. गाईडच्या मार्गदर्शनाखाली किल्ला पहायला चार तास लागले.वास्तुशास्त्राचा अप्रतिम नमुना पाहताना सगळे आश्चर्यचकित झाले होते.256 एकरांना सुरक्षा भिंत,नागमोडी वळणावरील सात भव्य प्रवेशद्वारे,

पाण्याची व्यवस्था,वॉच टॉवर,खंदक, मेंढा तोफ,भुयारी मार्गातील भुलभूलय्या,निवास आणि मंदिराचे बांधकाम, दुर्गा तोफ असा हा अभेद्य किल्ला तोही मित्रांसोबत पाहणं एक अल्हाददायक अनुभव होता. सगळेजण भुलभूलय्या पार करून वरच्या टप्प्यावर आले खरे पण वेडात दौडलेले फक्त सातच वीर सत्यजित, योगीराज, गणेश, गौतम, रमेश, प्रदीप आणि अर्जुन दुर्गा तोफे पर्यंत पोहोचले. त्यानंतर आम्ही पैठण रोडवर सविताच्या घरी गेलो. तिच्या कॉलनीच्या शेजारीच वाल्मि संस्थेचे कॅम्पस आहे. निसर्गरम्य परिसरात तिचे घर पाहताना खूप छान वाटले. त्यानंतर वाटेत MCED  संस्थेला भेट देऊन  पुन्हा वन विभागाच्या बंगल्यावर पोहोचलो तर खानसामाने पुरणपोळीचा बेत केला होता. खानसामाची पत्नी,आई उत्तम सुगरण आहेत. जेवणानंतर त्यांचे कौतुक केले तर त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.जेवणानंतर औरंगाबादच्या तारा पान सेन्टर मधील मगई पानाचा आस्वाद घेतला.


जेवणानंतर गेटटुगेदरच्या समारोपासाठी आम्ही एकत्र बसलो. यात गौतम गुणाजी बेळगांवहुन तर दयानंद काद्रे हैद्राबाद हुन आले होते.त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले. उद्योग व्यवसायामुळे बिझी असलेले अविनाश जोशी, संजय सावंत थोडा वेळ का होईना पण गेटटुगेदरला हजेरी लावून गेले. प्रदीप गारटकरची मात्र उणीव भासली.एकएक करून सगळे बोलायला लागले तर सत्यजित म्हणे, " मला सेंडऑफचा फील देऊ नका." पण खरंच सत्यजित, स्वाती आणि सविता, मिलिंद या चौघांनी हे गेटटुगेदर यशस्वी करायला फार मेहनत घेतली. त्यांच्या एनर्जीला सगळ्यांनी दाद दिली. त्यांनी प्रत्येकाकडून जोडीचे फोटो मागविले होते आणि स्कूलच्या इमारतीचा फोटो पण मिळविला होता. स्कूलची इमारत आणि जोडीचा फोटो 'मग' वर छापून प्रत्येकाला भेट द्यायची नावीन्यपूर्ण कल्पना त्यांनी राबविली. समारोपात बोलताना प्रमिला जाधव, प्रशांत कुलकर्णी, संजीवनी यांना अश्रू अनावर झाले होते. तर गौतम गुणाजी, सविता पटवर्धन, गणेश देशपांडे, उज्वला अर्णिकर फारच भावुक झाले होते.घनश्याम शहा,अर्जुन ठोंबरे,राजेंद्र आणि रमेश देवकर, प्रदीप शहा,यांच्या सुंदर सहभागामुळे गेटटुगेदरची रंगत वाढली.

या गेटटुगेदरचे वेगळेपण म्हणजे सगळे मित्र आणि मैत्रिणी जोडीने आल्यामुळे मित्रांच्या बायका आणि मैत्रिणींचे नवरे सगळ्यांचीच एकमेकांशी मैत्री वाढायला मदत झाली. आयोजकांचे, वन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे, खानसामाचे आभार मानून पुन्हा लवकरच भेटू असे ठरवून संध्याकाळी सगळे आपापल्या ठिकाणी मार्गस्थ झाले.


आयुष्यात बालपण, शिक्षण, नोकरी, व्यवसाय,प्रोफेशन, छंद, प्रवास,अशा विविध टप्प्यावर लोकं भेटतात परंतु केवळ बालपण आणि शिक्षणाच्या वेळी भेटलेले मित्रच निःस्वार्थ, निखळ, स्वच्छ मैत्री करतात आणि जपतात असा बहुतेकांचा अनुभव असावा.

म्हणूनच जुनी मैत्री खरीखुरी आणि ऊर्जादायी असते.


योगीराज देवकर.

लेखक, प्रेरक, प्रशिक्षक.

www.motivationacademy.in