Thursday 7 March, 2024

केल्याने होत आहे रे!

 केल्याने होत आहे रे!

डेंटिस्ट डॉ चेतन पोपटराव पराडे हे डॉ आकाश कदम या माझ्या मेव्हण्याचा क्लासमेट त्यामुळे माझी त्यांच्याशी ओळख झाली. मागच्या वर्षी मला समजले की त्यांनी पन्नास एकर केळीचे पीक केले आहे तेव्हापासून त्यांचे शेत पहायला जाण्याची इच्छा होती ती 29 जानेवारीला पूर्ण झाली.

सकाळी पुण्याहून निघून 10.30ला सासरे श्रीबलभीमराव जाधव कु.आकाश जाधव आणि मी महाळुंग, श्रीपूर या गावी पोहोचलो. त्यानंतर पुढील तीन तास ऐकत आणि पहात राहिलो डॉ चेतन पराडे याची रोलर-कोस्टर, चढ-उतारांची सक्सेस स्टोरी...


2020 मध्ये शेती महामंडळाची शंभर एकर जमीन ठराविक कालावधीसाठी भाडेकराराने देण्याची एक जाहिरात होती. डॉ चेतन यांनी हा फॉर्म भरला. यांचा दर कंपेटिटिव्ह असल्यामुळे अर्ज मंजूर झाला. सुरुवातीलाच दोन वर्षाचे भाडे डिपॉजिट स्वरूपात भरायचे होते ते यांनी भरले. प्रोजेक्टचे नामकरण निर्मला ऍग्रो अँड फार्म्स (NAAF) असे केले. 2021 ला जमिन ताब्यात मिळाली आणि कामं सुरु झाली तितक्यात कोरोना वाढला ज्याचा चेतनला डॉक्टर फायदाच फायदा झाला.डॉक्टर असल्यामुळे पुणे - श्रीपूर विना अडथळा ये-जा करता येत होते, लॉकडाउन मध्ये शेतीची कामं सुरु होती पण कोरोनाच्या भीतीने स्थानिक लोकांच्या हाताला काम नव्हते  त्यामुळे या कामाला माणसं, यंत्रणा उपलब्ध झाली आणि लोकांना रोजगार मिळाला.


ती शंभर एकर जमीन गेली 8-10 वर्ष पडीक होती. सगळीकडे वेड्या बाभळींचे जंगल वाढले होते. जेसीबी लावून सर्वप्रथम ते काटेरी जंगल साफ केले, त्याची विल्हेवाट लावली आणि जमीन स्वच्छ केली. आता शंभर एकर जमीनीची कशी डेव्हलोपमेंट करायची याचा एकत्रित प्लॅन करणे गरजेचे होते. यात त्यांना काही जाणकार आणि नेटाफेम एजन्सीचे सहकार्य झाले. शेतात कॅनॉलचे पाणी येत होते. अगोदर एक छोटे शेततळे तयार केले, कॅनॉलचे पाणी या शेततळ्यात घेतले, तिथेच शेत मजु्रांसाठी खोल्या बांधल्या आणि शेतीचा श्रीगणेशा झाला. पण एव्हढ्याने त्या शंभर एकरांचे भागणार नव्हते. मग हाती घेतला सहा एकर आकाराचा भव्य शेततळ्याचा प्रोजेक्ट.  सहा एकरावर जमिनीच्या खाली 15 फूट आणि जमिनीच्या वर 20 फूट महाकाय प्रोजेक्ट पोकलेन, हेवी ट्रक्स, ब्लास्टिंगच्या मदतीने अहोरात्र कामं करून केवळ दोन महिन्यात पूर्ण केला. इथं जी कामं करायला माणसं होती त्यांच्यासाठी गावातच एक मेस लावली होती केवळ त्याचं बिल तीन लाख झाले होते. शेततळ्यावर जो प्लास्टिक पेपर अंथरला आहे तो पस्तीस लाखाचा आहे. या शेततळ्यातून जी काळी माती बाहेर काढली ती शेततळ्याचा भराव लेवल करण्यासाठी वापरली, दहा-दहा एकरांचे प्लॉट तयार केले,शेततळ्यातून जो मुरूम, दगड बाहेर आला त्यातून शेतात प्रत्येक प्लॉट पर्यंत जाण्यासाठी पंधरा फुटी रस्ते तयार केले. स्वतंत्र डीपी घेतला, त्या शेततळ्यावर प्रत्येकी दहा HP च्या आठ इलेक्ट्रिक मोटरी बसविता येतील अशी सोय केली, सध्या चार मोटारी आहेत. आठ सॅन्ड फिल्टर्सची सिस्टीम उभारली, इथून प्रत्येकी दहा एकर क्षेत्रात ड्रीप इर्रीगेशन होईल अशा आठ पाईपलाईन सुरु होतात. एक मोटर चालू केली तर दहा एकर भरणे होते. आठ मोटरी चालू केल्या तर एका वेळी 80 एकर भरणे होऊ शकते. पिकांना औषधे, बुरशीनाशके, खते ड्रीप मधून देण्याची सोय आहे. शेतावर वर्षभर बांधील कामं करणारे दहा महिला आणि दहा पुरुष कामगार आहेत. या प्रोजेक्टमुळे डायरेक्ट इनडायरेक्ट 40-50 लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. सुदैवाने इथं कामं करणारे मॅनेजर आणि कामगार श्रमांची, मोबदल्याची जाणीव असलेले आणि प्रामाणिक आहेत. हा कर्मचारी वर्ग खुरपण, शेणखते टाकणे, मल्चिंग करणे, कीटक नाशके फवारणे, पिकांची निगा राखणे, पाणी व्यवस्थापन करणे आदी कामं अगदी आपलेपणाने करताना आढळले. चेतनने सुरुवातच पन्नास एकर केळी पिकापासून केली. पीक चांगलं आलं, एक्स्पोर्ट केलं आणि चांगला आर्थिक फायदा झाला. आता त्यांच्या प्रोजेक्टला तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. सुरुवातीला पपई , कलिंगड ही पिकं केली जी चांगलीच तोट्यात गेली. एकदा वादळ झालं आणि तीन एकर केळी आलेल्या फळासह झोपली, म्हणजे पुन्हा मोठं नुकसान. सध्या शेतावर प्रत्येकी दहा एकरावर आलं, पेरू, शेवगा आहे, पन्नास एकरावर केळी पीक सुरु, खोडवा, निडवा आहे आणि उर्वरित क्षेत्रात ऊस होता. हे मी एका वाक्यात लिहून मोकळा झालो पण त्यामागे आहेत डॉक्टरचे अपरिमित कष्ट.


चेतन स्वतः एक डॉक्टर असल्यामुळे त्यांना प्रत्येक पिकाच्या तब्बेतीमधील लहानसहान बदल लगेच लक्षात येतात आणि त्यावर लागलीच उपचार करतात. शेणखत, मळी, राख, औषधे, खते, इ. पुरवठा धारक आणि मालाच्या विक्री, एक्स्पोर्टचे नेटवर्क उभे केले आहे.


चेतनचे मुळ गांव बाभुळगाव जे श्रीपूर पासून 15 किमीवर आहे. तिथे त्यांची वडिलोपार्जित 16 एकर जमीन आहे. या 16 एकराच्या अनुभवरून चेतनने ही 100 एकराची उडी घेतली आहे जी फारच कौतुकास्पद आहे. यात आढळतं ते चेतनचे व्हिजन, आर्थिक धोका, भांडवल उभारणी आणि व्यवस्थापन, साहस, हुशारी, कष्ट आणि उपयुक्त लोकांची सांगड घालण्याची कला. चेतन एकदम इनोसंट आहेत त्यांच्याकडे पाहुन या कार्याची कल्पना पण येत नाही.


कथा ऐकताना लक्षात आले की, इथं लाखात, कोटीत खर्च झाला आहे, होत आहे, हे मुळीच सोप काम नाही. आता आर्थिक उलाढाल पण त्याच प्रमाणात आहे. या प्रोजेक्टबद्दल बोलताना ते म्हणाले, " हे करत असताना मला भीती अशी कधी वाटलीच नाही. ना कधी दडपण आलं, ना कधी झोपमोड झाली. ही सारी श्री माताजी निर्मला देवींची कृपा.सगळं कसं सहज चाललं आहे. घरातल्या सगळ्यांचा सपोर्ट आणि दाखविलेला विश्वास तितकाच महत्वाचा आहे."


वॉटर मॅनेजमेंट सिस्टीमच्या ठिकाणी छान शेड उभारले आहे. छोटेखानी ऑफिस आहे. ऑफिसमध्ये श्री माताजींचा फोटो आहे. चेतन इथली शेती सहजकृषी प्रमाणे करतात. म्हणजे काय तर शेती, पिकं करण्यासाठी वैश्विक चैतन्य आणि पृथ्वी किंवा पंच तत्वाचे सहाय्य घेणे. ही श्री माताजींनी सहजयोगात निर्माण केलेली सहजकृषी पद्धती आहे. यात कामगारांचा पण सहभाग आहे.


डॉ चेतनने खरंच इथं नंदनवन उभ केलं आहे. ते म्हणाले, " इथं शेततळ्याजवळ, वॉटरसप्लायजवळ आलं की पूर्ण शंभर एकरातील पिकांचे विहंगम दृष्य दिसते आणि इथलं वातावरण इतकं आल्हाददायक असतं की,अगदी काश्मीर सारखं वाटतं. "


डॉ चेतनला भविष्यात अजून यश प्राप्त करण्यासाठी शुभेच्छा.


शब्दांकन...

लेखक योगीराज देवकर.