Friday, 23 January 2026

मास्लो: ५: आत्मविष्कार गरज.

 *मानवाची पाचवी गरज*  वास्तविकीकरणाची गरज: (Self-Actualization):

व्यक्तीची अंतर्गत क्षमता पूर्णत्वास नेणे, सर्जनशीलता, नैतिकता, सत्याचा शोध, स्वतःच स्वतःचा गुरू होणे व स्वतःचे सर्वोत्तम रूप साकार करणे—ही मानवाची सर्वोच्च गरज मानली जाते. 


या पातळीवरील मनुष्य  आपली अंतर्गत क्षमता पूर्णत्वास नेण्यासाठी जगतो. स्वतःचा ठसा उमटवतो ,उदाहरण निर्माण करतो ,महामानव होतो,जीवन सार्थक करतो.


या गरजेची मुख्य वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत—

- स्वतःच्या खऱ्या,अस्सल,मूळ स्वरूपाची ओळख होते  आणि ओळखीचा स्वीकार होतो .

- सर्जनशीलता, नवे विचार,नव्या शक्यता, कलात्मक किंवा बौद्धिक अभिव्यक्ती होते .

- नैतिक मूल्यांशी निष्ठा ठेवली जाते , सत्याचा शोध घेतला जातो, न्यायबुद्धीचा उपयोग केला जातो.

- स्वतःच्या क्षमतांचा समाजहितासाठी उपयोग केला जातो.

- बाह्य ,भौतिक यशापेक्षा आंतरिक समाधान व अर्थपूर्ण जीवन जगतो.


अशी असामान्य माणसे म्हणजे कोण तर जी नव्या शक्यतांना (New possibilities) जन्म देतात. अशा व्यक्ती “मी काय होऊ शकतो?” या प्रश्नाचे उत्तर प्रत्यक्ष जीवनात साकार करत असतात. 


मॅसलो म्हणतो—

“What a man can be, he must be.”

(माणूस जे होऊ शकतो, ते होणे त्याच्यासाठी आवश्यक आहे.)


Self actualization हा शब्द मला प्रचंड आवडतो. सेल्फ म्हणजे स्व, स्वतः . Actualization म्हणजे वास्तविकीकरण . खरे,सत्य ,वास्तविक तुम्ही कसे आहात हे तुम्हाला समजणे किंवा बोध होणे. 


ज्या माणसाला असा बोध होतो त्या माणसाला हा ' शोध ' हा ' बोध ' खरा आहे हे सिद्ध करून दाखवायचे असते. कोणाला ? तर स्वतःलाच.


संपूर्ण जगात अशा या उच्च गरजेपर्यंत  किती टक्के लोक पोहोचतात? असा प्रश्न मला पडला होता.


याबाबत अचूक सांख्यिक टक्केवारी उपलब्ध नाही, कारण स्व वास्तविकीकरण, ( Self-Actualization) ,  आत्मविष्कार , ( Self-realization), हे मोजता येणारे भौतिक यश नसून एक वास्तविक ,मानसिक, आध्यात्मिक,  अवस्था आहे.

तरीही मॅसलो व नंतरच्या मानसशास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार—

अंदाजे १% ते २% लोकच खऱ्या अर्थाने वास्तविकीकरण गरजेच्या उच्चतम टप्प्यापर्यंत पोहोचतात. २०२५ पर्यंत जगाची लोकसंख्या आहे ८१० कोटी (यातली भारतात १४० कोटी आहे .)म्हणजे जगात आत्मविष्कार झालेले लोक आहेत किमान ८ कोटी १० लाख  ते कमाल १६ कोटी २० लाख. खरंतर हेच ते लोक आहेत जे हे जग माध्यम बनून चालवित आहेत. यात बियाण्याचा वाण शोधलेला शेतकरी असू शकतो, ठिबक सिंचनचा शोधकर्ता असू शकतो,महिलांसाठी शिक्षणाची द्वारे उघडणारी सावित्रीबाई आहे, कवियत्री बहिणाबाई आहे ,रामदास,तुकोबा, ज्ञानदेव आहेत , ज्ञानेश्वरीचा अनुवाद करणारे गो नी दांडेकर आहेत , लोकांना आध्यात्मिक मार्ग दाखविणाऱ्या श्री माताजी निर्मला देवी आहेत ,लोकांना पारतंत्र्यातून स्वातंत्र्यात आणणारे महात्मा गांधी आहेत , पराक्रमी सैनिक आहेत....खेळाडू, समाजसेवक  अशी अनेक उदाहरणे देता येतील.


बहुसंख्य लोक पहिल्या चार गरजांमध्येच अडकलेले राहतात आणि त्यातही कमी प्रतीच्या प्रतिष्ठे पर्यंतचे जीवन जगतात ,म्हणजे खरंतर साडेतीन गरजा ...

याचे कारण म्हणजे—

आर्थिक अस्थिरता, सामाजिक दबाव, भीती, असुरक्षितता, अज्ञान , आणि स्वतःकडे पाहण्याची सखोल तयारी यांचा अभाव.


जे लोक " मी कोण आहे?" " मी काय आहे?" "माणूस म्हणून जन्माला येण्याचा अर्थ काय आहे?" " अशी कोणती महाशक्ती आहे जी पंच महाभूतांना चालविते , मला पण त्या शक्तीशी जोडले जाता येईल का ?" "  मला जे मिळाले आहे मग ते ज्ञान,ताकद,संपत्ती,सत्ता, प्रज्ञा, काहीही असेल ( तन,मन,धन ) त्याचा इतरांसाठी कसा वापर करता येऊ शकतो?" याचा शोध घेतात आणि तसे वागतात. ते खरं समाधान हे ' आत' आहे हे ओळखतात ते जास्त प्रतीच्या प्रतिष्ठेकडे प्रवास करतात. केवळ असेच लोक गरजेच्या पाचव्या उच्चतम गरजेकडे जातात.


थोडक्यात निष्कर्ष:

वास्तविकीकरण, आत्मविष्कार,आत्मसाक्षात्कार ही माणसाच्या जीवनाची उच्चतम शक्यता आहे; ती दुर्मीळ असली तरी अशक्य नाही. योग्य परिस्थिती, आत्मचिंतन, मूल्यनिष्ठा ,विचारविवेक, आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे व्यक्ती या अवस्थेकडे वाटचाल करू शकते.


योगीराज देवकर.😊

No comments: