Friday, 23 January 2026

गरजा विरुद्ध इच्छा, हव्यास.

 *मानवाच्या Needs (गरजा) आणि मानवाच्या Wants (इच्छा/हव्यास) यांतील फरक:*


आजच्या या मोहमायेच्या जगात गरजा आणि इच्छा/हव्यास यातील फरक समजण्याची फार गरज आहे.


अर्थशास्त्र आणि मानसशास्त्र दोन्ही दृष्टीने हा फरक महत्त्वाचा आहे. 

1) Needs (गरजा) म्हणजे काय .

अर्थ :

मानवी जीवन टिकवण्यासाठी व मूलभूत कल्याणासाठी अनिवार्य असलेल्या गोष्टी म्हणजे गरजा.

वैशिष्ट्ये :

जीवनावश्यक असतात,

पूर्ण न झाल्यास जीवन, आरोग्य किंवा विकास धोक्यात येतो,

मर्यादित व तुलनेने स्थिर असतात,

सर्व मानवांमध्ये साधारण सारख्या असतात,

उदाहरणे :

ऑक्सिजन,पाणी, अन्न, वस्त्र, निवारा,

सुरक्षितता,सामाजिक आपुलकी (कुटुंब, समाज),प्रतिष्ठा, आत्मविष्कार. अब्राहम मास्लो या मांडलेली Theory of Needs Hierarchy तुम्ही वाचलेली आहे. या अशा गरजा आहेत ज्याशिवाय माणूस राहू /जगू शकत नाही.


*आता गरजांच्या  विरुद्ध इच्छा/ हव्यास म्हणजे काय* :


2) Wants (इच्छा / हव्यास)म्हणजे काय .

अर्थ :

सुखसोयी,आराम,प्रतिष्ठा किंवा आनंद वाढवण्यासाठी असलेल्या *पण अनिवार्य नसलेल्या गोष्टी* म्हणजे इच्छा/हव्यास.


वैशिष्ट्ये :

जीवनासाठी आवश्यक नाहीत: 

म्हणजे याशिवाय तुम्ही जिवंत राहू शकता.


या व्यक्तीनुसार बदलतात: व्यक्ती तितक्या प्रवृती , एकाच घरातील सदस्यांचा इच्छा,हव्यास कमी,अधिक प्रमाणात वेगवेगळ्या असू शकतात .


अमर्याद व सतत बदलणाऱ्या असतात: मोहमायेला मर्यादा नसते, ' मला हे हवं',' मला ते हवं' , याला काही अंत नाही, बरं तुम्ही हवं ते घेतलं तर थोड्याच दिवसात मार्केट मध्ये काहीतरी नवीन येतं,आता तुम्हाला ते पण पाहिजे असतं. जगभरातल्या उद्योजकांचे हेच तर बिझनेस मॉडेल आहे,उद्योजक उत्पादक आहेत आणि तुम्ही ग्राहक (गिराईक)आहात. तुम्ही कधी मॉल,कॉल,ऑनलाईन ऑर्डर्स,पार्सल, कल्चरचा भाग बनता ते तुम्हालापण कळत नाही.


संस्कृती,उत्पन्न,फॅशन, जाहिरात यांवर अवलंबून असतात:

प्रत्येक राज्याची,देशाची ,खंडाची संस्कृती भिन्न असते. पण आता स्थलांतर,पर्यटन,मिडिया यामुळे मिश्र संस्कृती वाढत आहे. माणूस हा अनुकरणप्रिय असल्यामुळे तो दुसऱ्यांच्या संस्कृतीची पण कॉपी करू लागला आहे.


उत्पन्नाच्या बाबतीत 

दारिद्र्य,गरिबी,मध्यम वर्गीय, उच्च मध्यम वर्गीय, श्रीमंत, अती श्रीमंत असे गट आहेत, या प्रत्येकाला वरच्या श्रेणीतल्या गटाशी बरोबरी,स्पर्धा करायची असते. ते करतायेत त्यात सुख आहे असे प्रत्येक गटाला वाटत आहे आणि माणूस मृगजळाच्या मागे पळत आहे.


फॅशन बद्दल तर काय बोलावे , जगात  दर सेकंदाला एक नवीन फॅशन उदयाला/जन्माला येत आहे. फॅशनचा मोह झाला नाही तर नवलच. तुमच्याकडे बुटापासून सुटापर्यंत आणि ड्रेस पासून साडी पर्यंत सगळ्या गोष्टी असतात तरी नवीन बूट,नवीन सूट ,नवीन ड्रेस,नवीन साडी मार्केटमध्ये किंवा ऑनलाईन दिसली की ते पण तुम्हाला पाहिजे असते आणि गरज नसताना तुम्ही ते  खरेदी करता.


जाहिरातींचा तर सुळसुळाट आहे, होर्डिंग्ज, प्रसार माध्यमे, सोशल मीडिया,ऍमेझॉन,गुगल , ॲप्स , मोबाईल,यांनी मानवाचा मेंदू हायजॅक केला आहे,तुमच्या मेंदूचे अपहरण झाले आहे,त्यांनी तुमचा मेंदू जबरदस्तीने ताब्यात घेतला आहे, तुम्ही,जागेपणी,झोपेत काय पहायचे,

खायचे,प्यायचे, ल्यायचे,घ्यायचे,द्यायचे,रहायचे,फिरायचे,इ.ते हे दुसरेच कोणीतरी ठरवत आहे आणि तुमचा मेंदू तुम्ही जाहिरातदारांकडे गहाण ठेवला आहे. 


उदाहरणे :

महागडे कपडे, गाडी, मोबाईल,एसी, आलिशान घर,ब्रँडेड वस्तू, पर्यटन,

प्रसिद्धी, सामाजिक प्रतिष्ठा,स्पर्धा,इर्षा,पैसा,स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, असूया, हाव, इ.


आता हेच 

पहा ,लिहण्यासाठी पेन ही तुमची गरज झाली , दहा रुपये किमतीच्या पेन ने तुमची गरज भागते,पण मार्केट मध्ये पेनचे दहा रुपयांपासून दहा लाख रुपया पर्यंत प्रकार उपलब्ध आहेत. शे,

पाचशे,हजार,लाख रुपयांचा पेन खरेदी करणे ही इच्छा /हव्यास झाला. हेच सर्व प्रकारच्या सेवा, ट्रेड,वस्तू ,उत्पादनांना    लागू आहे.


पूर्वी लोकांचा कल बचतीकडे होता आता खर्चाकडे आहे. पूर्वी दिवाळी दिवाळीतच साजरी व्हायची आता बारा महिने दिवाळी झाली आहे ,जसे काही राजाला दिवाळी माहीतच नाही.


असा आपण गरज नसताना कशा कशाचा हव्यास करतो त्याचा विचार करा.


निष्कर्ष

- गरजा पूर्ण झाल्याशिवाय जीवन शक्य नाही, हे सत्य आहे.

- इच्छा,हव्यास पूर्ण झाल्याने जीवन अधिक सुखकर होते,हेही खरं आहे.

- खरेदी,विक्री हा अर्थशास्त्राचा नियम आहे . पण त्या वस्तू नसल्या तरी जीवन चालू शकते. इच्छा /हव्यास याला किती बळी पडायचे हा खरा प्रश्न आहे.


लेखक : योगीराज देवकर.😊

[© 2026 Yogiraj Deokar]

No comments: