Thursday, 22 August 2024

सोयाबीन पिकात नुकसान.

 निर्मला फार्म-भाग तेरा - भुसार पिक सोयाबीन आणि नुकसान.

फुले संगम, फुले किमया हे सोयाबीनचे चांगले वाण आहेत अशी माहिती श्री निबे सर KVK दहीगांव यांनी मला दिली होती. फुले संगमचे बियाणे कृषी विज्ञान केंद्र, बारामती मध्ये उपलब्ध  झाले. बियाण्याची तीस किलोची एक बॅग असते. दर होता नव्वद रुपये किलो होता . 


सोयाबीन दोन इंच बाय अठरा इंच असे पेरले जाते. म्हणजे बियाणे पेरताना सरळ लाईन मध्ये प्रत्येक दोन इंचावर एक बी पडतो आणि दोन लाईन मधील अंतर अठरा इंच असते. असे बियाणे पेरले तर एकरी वीस किलो बियाणे लागते. मला ट्रॅक्टरचे जे पेरणी अवजार उपलब्ध होते त्यावर दोन इंच बाय बारा इंच किंवा चोवीस इंच असे सेटिंग करता येत होते. मी KVK, बारामती मधील श्री गावडे सरांना ही समस्या सांगितली तर ते म्हणाले खरंतर 2*18 इंच हेच योग्य प्रमाण आहे. पण हे शक्य नसेल तर 2*24 वर पेरणी करा. पण ही पेरणी विरळ होईल. 

अशा प्रकारामुळे वापस्यानुसार दोन एकर प्लॉट 2*24 पेरला होता.  वाटले तसेच झाले प्लॉट विरळ उगवला.


सोयाबीन पेरणी होईपर्यंत या प्लॉटवर फार खर्च झाला होता . शेतकऱ्यासाठी पिकपूर्व मशागतीचा भाग म्हणून उन्हाळ्यात शेत एकदा नांगरणे आणि पहिला पाऊस झाला की वापसा आल्यावर फणपाळी करणे हे कॉमन आहे. मी हे केले होते पण पिक करण्यापूर्वी सतत पावसाची रिमझिम सुरु राहिली त्यामुळे शेतात तण फार वाढले होते . शेतात ओल असल्यामुळे ट्रॅक्टरने मशागत करता येत नव्हती. मग बाया लावून धोत्रा, कासल्या असे मोठे तण उपटले , मोकळ्या शेताला तणनाशक फवारले , तण मरून उभे राहते किंवा आडवे पडते मग त्याचे तुकडे करण्यासाठी ट्रॅक्टरने रोट्याव्हेटर मारला , मग शेत पुन्हा फणले आणि शेवटी पेरणी केली यामुळे अनुउत्पादक खर्च फार वाढला . 


पेरणी झाली की लगेच पंधरा दिवसात तणनाशक फवारावे लागणार म्हणून तणनाशक पण आणले होते. सोयाबीन पिक करायला मनुष्यबळ जास्त लागते.विशेषतः जेव्हा पिक तयार होते तेव्हा. 


सोयाबीन उगवलेल्या शेतात पारव्यांचे थवे च्या थवे येत होते आणि बिया किंवा अंकुर आलेल्या बिया खात होते आणि पिकाचे नुकसान करत होते . शेतात ओल असल्यामुळे सोयाबीन उगवून आले होते , ओलीमुळे पाणी दिले नाही, पण ते द्यायला पाहिजे होते . एकतर 24 इंचावर पेरणी, आणि पक्षी यामुळे सोयाबीन फार विरळ उगवले होते . आता हे पिक मोडावे लागणार आहे. तणनाशक परत करता येईल पण पाच एकर सोयाबीन करायचे होते म्हणून आणलेले बियाणे पण अंगावर पडले आहे. एकूण काय तर आर्थिक नुकसान.

यावर्षीच्या पिकातले हे अपयश आहे .


काय काय चुकले. 1)बियाणे KVK बारामती मधून न घेता इंदापूर मधील दुकानातून घ्यायला हवे होते. राहिलेले परत करता आले असते. 2) पेरणी 2*18 इंच वरच करायला हवी होती. 3) पेरणी झाल्यावर शेतात ओल होती तरी पाणी द्यायला हवे होते. 4) पारवे पक्षी शेतात नुकसान करणार नाहीत हे पहायला हवे होते. 5) वाटेकऱ्याने पाणी, पक्षी याकडे दुर्लक्ष केले. 6) मनुष्यबळ कमी असताना असले भुसार पिक करायला नको होते. 7) पेरणी सोबत खत टाकले ते टाकायला नको होते.


शेतकऱ्यांना अशी भुसार पिके परवडत नाहीत. खाया पिया कुछ नहीं और 35 हजार का नुकसान हो गया l आता पिक मोडायला खर्च होणार आहे तो वेगळाच. भुसार पिकाचा असा अनुभव मला यापूर्वी पण आला होता. शेतात भुसार पिक करणे म्हणजे खिशातले पैसे खर्च करून ग्राहकाला धान्य पुरविणे आहे. तरीही क्षेत्र उपलब्ध आहे म्हणून मी पुन्हा तीच चूक केली असेच म्हणावे लागेल.


लेखक...

योगीराज देवकर.

Motivation Academy.

No comments: