Monday, 5 August 2024

साग वृक्षतोड कहाणी

निर्मला फार्म-भाग दहा- शेतातील सागवान वृक्षतोड अधुरी कहाणी .


या कहाणीची सुरुवात सन 1999-2000 सालापासून होते. तेव्हा मी वनराई संस्थेच्या संपर्कात होतो. मुंढव्यातील कोद्रे नावाचे एक अधिकारी वनराईत होते. त्यांच्याच मदतीने मी सागवानची रोपे मिळवली आणि शेताच्या बांधावर लावली. यातील शंभरपेक्षा जास्त वृक्ष सध्या वाढ झालेले आहेत.तेव्हा सातबारावर त्यांची नोंद  केली होती. आता हे वृक्ष मोठे झाले आहेत. पंचवीस वर्षानंतर या सागवान वृक्षाचे इल्ड घेण्याची वेळ आली आहे असे मला वाटले होते.


सर्वप्रथम मी वन परीक्षेत्र कार्यालय इंदापूरला भेट दिली. तेथील अधिकाऱ्याने सागवान वृक्ष तोडीस परवानगी मिळविण्यासाठी अर्ज करा, त्यासोबत सातबारा ज्यामध्ये सागाच्या झाडांचा उल्लेख असेल, नसल्यास तलाठी यांचा दाखला आणि गांव गट नकाशा जोडा असे सांगितले.अर्जाला 10₹ रेव्हेन्यू स्टॅम पेपर लावण्यास सांगितले.माझ्या सातबारावर पूर्वी साग झाडांची असलेली नोंद तलाटी भाऊसाहेब यांनी कमी केलेली होती. मग तलाठी कार्यालयाकडून दाखला मिळविण्यासाठी दोन आठवडे प्रयत्न केले पण तलाठी भाऊसाहेब लोकसभा निवडणूकीच्या कामात व्यस्त. शेवटी त्यांच्या स्टाफने पीकपाणी, वृक्ष नोंद केली आणि माझे अर्जाचे काम मार्गी लागले.


23 एप्रिल 2024 रोजी अर्ज दाखल केला आहे. अर्ज घेताना त्यांनी मला सांगितले की, लवकरच आमचा अधिकारी तुमच्या शेताला व्हिजिट करेल. तेव्हा तुम्ही अधिकाऱ्यांस देण्यासाठी दोन गोष्टी तयार ठेवा. एक - कोणत्याही नर्सरीची कोणत्याही प्रकारची उदाहरणार्थ आंबा, चिक्कू 240 झाडांची रोपे बुक केले असल्याची पावती आणि दोन - 120 सागवान वृक्ष कापल्यानंतर तुम्ही शेतात 240 झाडांचे वृक्षारोपण करणार आहात याचे 100₹ स्टॅम्प पेपरवर हमीपत्र लिहून देण्यासाठी 100₹ चा स्टॅम्प पेपर.हा स्टॅम्प पेपर पण मी घेतला होता.


मीच त्यांना विचारले तुमच्या माहितीत सागवान खरेदी करणारे कोण व्यापारी आहेत का? त्यांनी हो म्हणून लगेच अकलूज येथील एका व्यापाऱ्यास फोन लावला. त्यांना माझ्याकडील साग झाडांची माहिती दिली . त्यांचा नंबर मला आणि माझा त्यांना देवून एकदम तत्पर सेवा दिली. वर मला म्हणाले बघा तुमचा व्यवहार ठरतोय का. जर ठरला तर तो व्यापारीच या परवानग्या आणि जे काही मॅनेज करायचे ते करेल. तुम्हाला काही धावपळ करावी लागणार नाही. मी विचारले मला काय मॅनेज करावे लागणार आहे. तर ते म्हणाले अहो सुरुवातीला तुम्हाला वृक्ष तोड परवानगी घ्यावी लागते, त्यानंतर वाहतूक परवानगी  घ्याव्या लागते. आमच्या अधिकाऱ्याच्या शेताला व्हिजिट होतात. प्रत्येक वेळी हे प्रस्ताव परवानगीसाठी पुणे कार्यालयात पाठवावे लागतात. हे सर्व वेळेत करायचे असेल तर तुमची किती धावपळ होईल.


थोड्याच वेळात मला त्या व्यापाऱ्याचा फोन आला.झाडं कुठं आहेत? किती आहेत?किती मोठी आहेत? कवळ्यात बसतात का? मी म्हणालो तुम्ही पहायला याल का? तर म्हणाले नाही, तुम्हीच झाडांचे फोटो पाठवा. 


मी त्यांना सागवान लाकडाचा दर विचारला तर म्हणाले 11000₹ टन. मी म्हटले सागवान दर तर घनफुटावर असतो ना? ते म्हणाले आम्ही टनावरच घेतो.

मी जेव्हा ही झाडे लावली तेव्हा मला सांगण्यात आले होते की, वीस, पंचवीस वर्षानंतर ही झाडे घन फुटावर विकली जातील. मी यू ट्यूब वर काही व्हिडीओ पाहिले तर त्यात सध्या सागाचा घनफुटाचा दर 2500 ते 5000₹ इतका सांगत होते . याचा अर्थ माझ्या चांगली वाढ झालेल्या एकाएका झाडाची विक्री किंमत किमान 40 ते कमाल 60 हजार ₹ व्हायला हवी आहे.


एक व्यापारी तर मला म्हणे मी तुम्हाला जास्तीत जास्त 18000₹ टन प्रमाणे भाव मिळवून देतो. 

एक नासिकचा व्यापारी आहे. बोला मला किती कमिशन देता.


पुण्यातील एका सॉमिल मालकाने मला सागाच्या फ़ांद्याला 8000₹ टन आणि खोडला 18000₹ टन असा दर सांगितला होते .


साग रोपे खरेदी करताना किंवा लावण्यापूर्वी फार छान आकर्षक माहिती दिली जाते पण विक्रीची वेळ येते तेव्हा खरी वस्तुस्थिती कळते. म्हणजे नर्सरी वाल्याची कमाई होते आणि शेवटी शेतकरी हवालदिल होतो.


आता अर्जाचा पाठपुरावा म्हणून मी वन विभागातील अधिकाऱ्यांस मोबाईल फोन लावले.पण नो रिप्लाय. माझे मिसकॉल पाहुन रिप्लायचे सौजन्य नाही. मी सादर केलेल्या अर्जावर त्यांनी स्वतःहून किती दिवसात कार्यवाही करावी असा काहीतरी नियम असेल ना अशी माझी भाभडी समजूत आहे . जवळपास गेल्या तीन महिन्यात मला या कार्यालयातून ना कोणाचा फोन आला, ना कोणा अधिकाऱ्याने माझ्या शेताला भेट दिली. मी मला वन विभागाकडून गांधीजींना अपेक्षित असलेल्या 'ग्राहकांप्रमाणे' सेवा मिळेल याची वाट पहात आहे आणि ते कदाचित 'गिराईक' म्हणून माझी वाट पहात असावेत असा हा प्रकार वाटतो आहे . लोणीतील एका शेतकऱ्याला साग विक्रीचा फारसा चांगला अनुभव आलेला नव्हता . एका व्यापाऱ्यांने पण मला चांगल्या अनुभवाची अपेक्षा करू नका असे सांगितले. सागवृक्ष कापल्यानंतर त्यांची लगेच वेळेवर वजन करून वाहतूक होणे आवश्यक असते कारण शेतकऱ्याला वजनावर पैसे मिळणार असतात. हे लगेच घडलं तर शेतकऱ्याचा फायदा आणि जितका उशीर तितका व्यापाऱ्याचा फायदा. यासाठीच तर वृक्षतोड आणि वाहतूक दोन्ही परवाने त्वरित मिळणे गरजेचे असते.


माझ्या अर्जाला आता तीन महिने होत आले आहेत. हे काम उन्हाळ्यात होणे अपेक्षित होते. परवाने मिळायला अशी टाळाटाळ होत असेल तर सध्यातरी आपली साग वृक्षतोड रद्द.


लेखक...

योगीराज देवकर.

Motivation Academy.

No comments: