Tuesday, 25 June 2024

वाटेकरी

 *निर्मला फार्म*-भाग एक -  *वाटेकरी भेटला.*

यापूर्वी माझ्या शेतात बलभीम चितारे, बाळू चितारे, सुरेश चवरे हे शेतमजूर वाटेकरी होवून गेले . सुरेश चवरेला शेतातून काढायचे ठरल्यानंतर मी जून -जुलै 23 पासून वाटेकरी शोधत होतो. पण काही केल्या योग्य शेतमजूर वाटेकरी भेटत नव्हता. माझी अवस्था अगदी नटसम्राट सारखी झाली होती.

कुणी वाटेकरी देता का, वाटेकरी? एका तुफानाला कुणी वाटेकरी देता का?

एक तुफान पाहुण्या रावळ्यांना सांगतंय, शेतकरी मित्रांना सांगतंय, व्हाट्सअँप मेसेजेस करतंय, शेतात इतकं सारं भांडवल गुंतवून शेती करायला शेतमजूर वाटेकरी शोधत हिंडतंय, शहरात म्हणू नका, खेड्यात म्हणू नका सगळीकडं नुसतं वाटेकऱ्याला धुंडतंय.

कुणी वाटेकरी देता का? वाटेकरी?

एका तुफानाला कुणी वाटेकरी देता का? 

खरंच वाटेकरी मिळणं अवघड झालंय की काय असे वाटायला लागले आहे.आठ, दहा मजूर भेटले पण जे अयोग्य होते त्यांना मी रिजेक्ट केले आणि योग्य वाटले त्यांच्या अटी जास्त होत्या.आता एक वाटेकरी नक्की केल्यावरही किमान 3-4 चांगल्या मजुरांचे फोन आले पण त्यांना आता उशीर झाला.


लोकांना आता कामं हवी आहेत पण उणाताणात, शेताची, जास्त कष्टाची कामे नको आहेत. लोकांना सगळं कसं झटपट हवं आहे. नेमकी शेती झटपट श्रीमंत करण्यात मोडत नाही.


कोणत्याही कामाची योग्य वेळ यावी लागते.परमेश्वरी परम चैतन्याने जाणले आणि मला योग्य वाटेकरी भेटला असे मी समजतो.


नाव - राजेंद्र बजरंग लोंढे. मुळगाव - हत्तीज, ता. बार्शी, जि. सोलापूर. माझा भाचा मनोजकुमार सुभाष पाटील याने ही मध्यस्थी केली.

2 एप्रिल 2024 ला  राजेंद्र लोंढे, त्यांच्या पत्नी हेमा, मुलगा कु. महादेव, मुलगी सारिका, तिच्या दोन मुलीसह हे कुटुंब माझ्या शेतावर डेरे दाखल झाले.

वाटेकरी नेमणे ही पण एक प्रक्रियाच आहे. वाटेकऱ्याला एक लाख रुपये उचल / ऍडव्हान्स रक्कम द्यावी लागली. शिवाय दरमहा घरखर्चाला ठराविक रक्कम द्यायची आहे. त्यांच्या लेबर वर्क या जबाबदारीसाठी पण भांडवल शेतमालकालाच गुंतवावे लागते. वाटेकऱ्याचा रीतसर पाच वर्षांचा नोटराईज करार केला आहे. यात वाटेकऱ्याची जबाबदारी म्हणजे सर्व प्रकारचे लेबर वर्क आणि बाकी जबाबदारी शेत मालकाची असते . वाट्याचे हिस्से म्हणाल तर नगदी पीक केल्यास वाटेकऱ्याला चौथा वाटा मिळेल आणि भुसार पीक केल्या तिसरा वाटा मिळेल. याचा अर्थ वाटेकरी केलेल्या पिकाचा तिसऱ्या किंवा चौथ्या भागाचा मालकच असतो. शेतीच्या पिकात खेळत्या भांडवलाची सायकल फार सावकाश चालते. आता हेच पहाना. सोयाबीन पीक चार महिने, तुर साडेपाच महिने, केळी बारा महिने, ऊस बारा आणि आडसाली असेल तर अठरा महिने. उद्योगात खेळते भांडवल सायकल वर्षात किमान 5 ते 6 वेळा फिरते आणि हॉटेल सारख्या व्यवसायात तर दररोज फिरते. म्हणजे हॉटेल मध्ये सकाळी 100₹ गुंतविले तर रात्री त्याचे किमान 120₹ झालेले असतात.  शेतीत भांडवल फार महिने अडकून पडते आणि वाटेकऱ्याला, शेतकऱ्याला 6,12,18 महिन्यानंतर पैसे मिळतात. तेही अनिश्चित.


तुम्ही 12th Fail सिनेमा पाहिला असेल. त्यात एक डायलॉग आहे. . UPSC परीक्षा देताना चाचणी परीक्षा द्या, पास झाले की, मेन परीक्षा द्या , ती पास झाली की, मुलाखत द्या . यात कुठल्याही लेव्हल वर फेल झालं तर , मग पुन्हा बॅक टू क्वेअर वन. मग पुन्हा रिस्टार्ट, रिस्टार्ट, रिस्टार्ट.


या वर्षी गंभीर दुष्काळामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतीची अवस्था पण अशीच बॅक टू क्वेअर वन झाली आहे.याला मी पण अपवाद नाही. मग काय पुन्हा एकदा रिस्टार्ट आहे.


खरंतर जे काही होतंय ते सारं काही परम चैतन्यच करत असतं आपण केवळ निमित्तमात्र किंवा माध्यम असतो.आपण फक्त त्या परमेश्वरी चैतन्याशी एकरूप व्हायचे. मग सगळं कसं सहज होत राहतं. याचा अर्थ असेल हरी तर देईल खाटल्यावरी असा नाही.आपण आपले कर्म करत रहायचे. आपण जमिनीत बी पेरतो. ते कधी काळ्या मातीत , कधी मुरमाड मातीत,तर कधी दगड धोंड्यात पडते.तरी त्याला अंकुर फुटतो, त्याचे रोप बनते, त्याचे झाड होते. हे होताना त्याला त्रास होत नसेल का? होत असेल ना. पण हे दैवी कार्य अगदी सहज घडते. तसं आपण देवाशी जोडलेले राहूया. आपली संकल्प सोडलेली सर्व कामे सहज होत राहतील .


परमेश्वराच्या कृपेत या वर्षी शेतात केळी,ऊस, सोयाबीन,तुर अशी पिके घ्यायची आहेत. केळीला ड्रीप करायचे आहे. पिकपूर्व बरीच कामे करायची आहेत.परमेश्वरानेच आपल्याला या भूमिका दिलेल्या आहेत. आता बघूया यात हा राजेंद्र लोंढे वाटेकरी ही भूमिका कशी पार पाडतात ते.मुळात मजुरी, सालकरी आणि वाटेकरी यात फरक आहे. मजुरी ही दैनंदिन असते. एक दिवस कामं केले की लगेच मजुरी मिळते. सालकरी म्हणजे वर्षाला साधारणपणे 1.2 ते 1.3लाख रुपये या प्रमाणे वर्षभर काम करावे लागते. वाटेकरी म्हणजे शेतात जी पिकं घेतली जातात त्याच्या नफ्यात करारप्रमाणे वाटा मिळतो. या प्रत्येकाची मानसिकता वेगवेगळी असते. राजेंद्र पूर्वी सालकरी होते आता वाटेकरी झाले आहेत . त्यांनी वाटेकरी म्हणून कष्ट केले तर चार पट अधिक आर्थिक लाभ होऊ शकतो. पण यासाठी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबातल्या लोकांना खूप मानसिक बदल करावा लागेल. गाव बदललं की सहवास बदलतो. त्यांना चांगल्या लोकांचा सहवास ठेवावा लागेल.व्यसनी लोकं आणि व्यसनापासून दुर रहावे लागेल. शेतातले उत्पादन वाढावावे लागेल. 

कोणताही मजूर काम मिळेपर्यंत स्वतःची फार जोरदार जाहिरात करतो. मी एकरी इतके टन उसाचे उत्पादन काढेल,शेताचे कडे कोपरे स्वच्छ ठेवेल, पिकात तणतोडा दिसणार नाही,शेत एके शेत करेल, शेत सोडून उगाच इकडे, तिकडे बोंबलत फिरणार नाही, मला कसलंही व्यसन नाही,माझं इतक्या माणसाचं कुटुंब आहे सगळे शेतात कामं करतील,घरातल्यांनी कामं केली तर मजुरीचा पैसा बाहेर जात नाही हे मला माहित आहे ,मला मोटर,लाईट आणि पाईप लाईन कामातलं सगळं येत,इ. असंच सारं हे लोंढे पण बोललेले आहेत. त्यांच्या बोलण्यात आणि प्रत्येक्ष कामात काही फरक असायला नको इतकच वाटतं.कारण यावर्षीच्या नियोजनात वाटेकऱ्याची भूमिका फार महत्वाची आहे. बरं इतकं करून आपण या कुटुंबाला इकडे आणायचे आणि स्थानिक लोकं त्यांना MIDC त काम मिळेल,धुनी भांडी करा,दुसऱ्याच्या शेतावर मजुरी करा असले सल्ले  देत असतात. या फॅमिलीला शेतात कामं करायला आणलेले आहे. काही कोटी रुपये किंमतीचे शेत आणि येथील सोयी साधने त्यांच्या ताब्यात दिली आहेत. त्यांनी शेतात काम, कष्ट करत रहावे अशी अपेक्षा आहे. माझ्या राजेंद्र आणि महादेव कडून खूप आशा, आकांक्षा आहेत. त्यांनी चांगले कामं केले तर आम्हा दोघांनाही अपेक्षित पैसा,यश, आनंद आणी समाधान मिळेलच की.

लेखक...

योगीराज देवकर.

Motivation Academy.

No comments: