Thursday, 15 January 2026

मास्लो : ३: प्रेम/ आपुलकीच्या गरजा.

 *मानवाची तिसरी गरज* : 

सामाजिक/प्रेम/आपुलकीच्या गरजा: (Love and Belongingness Needs):


अब्राहम मॅस्लो यांच्या Theory of Needs Hierarchy च्या उतरंडी मधील ही तिसरी गरज आहे.


कुटुंब,नातेवाईक,मित्र, सहकारी, हितचिंतक,लोकसंग्रह, प्रेम,आपुलकीने सामाजिक स्वीकार—समूहाशी नाते जोडण्याची मानवी गरज या स्तरात येते.


मुळातच माणूस हा कुटुंबप्रिय,समाजप्रिय,समूहप्रिय प्राणी आहे.मानवाला  इतरांशी नाते जोडण्याची, प्रेम देण्याची व मिळवण्याची आणि समूहाचा भाग असल्याची तीव्र गरज असते. मानवाला सामूहिकता आवडते.


या स्तरात कुटुंबातील जिव्हाळा,नातेवाईकांशी खुलेपणाचे,प्रेमाचे संबंध, मित्रमैत्रिणींची संगत, दाम्पत्यातील प्रेम, सामाजिक सहभाग, तसेच समाजाकडून स्वीकार मिळणे यांचा समावेश होतो. व्यक्तीला “मी एकटा नाही, मी कोणाचा तरी आहे” " मी कशाचातरी भाग आहे " अशी भावनिक खात्री मिळणे ही या गरजेची मध्यवर्ती बाब आहे. म्हणूनच मानवाला  मित्रांचा ग्रुप असणे, नातेवाईकांच्या सुख दुःखात सहभागी होणे, टीम,गटात काम करायला आणि एकत्रित रिझल्ट्स निर्माण करायला आवडणे,नेतृत्व करणे,गणपती/ महिला/महाराष्ट्र मंडळ, औद्योगिक/कामगार/अधिकारी/सामाजिक/संघटना, राजकीय पक्ष,धार्मिक पंथ,असा कशाचातरी भाग असणे आवडते.आपण कोणत्यातरी गटाचा,विचारसरणीचा,प्रवाहाचा ,पंथाचा भाग आहोत ही बाब माणसाला प्रेम आणि आपुलकीची भावना देते.


प्रेम हा जीवनाचा पाया आहे. तुम्ही प्रेमळ असाल तर माणसे जोडता आणि दुष्ट असाल तर माणसे तोडता. म्हणूनच

प्रेमळ,दयाळू,करुणामय,उदार,माणसे सर्वांना आवडतात. दुष्ट माणसे खड्यासारखी बाहेर फेकली जातात.


या गरजा समाधानकारकरीत्या पूर्ण झाल्यास मानसिक स्थैर्य, भावनिक संतुलन आणि आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे सामाजिक व आपुलकीच्या गरजा मानवी जीवनातील भावनिक आरोग्याचा कणा मानल्या जातात.

परंतु या गरजा अपूर्ण राहिल्यास व्यक्तीमध्ये एकाकीपणा, ताणतणाव , नैराश्य, असुरक्षितता किंवा समाजापासून दुरावलेपण निर्माण होऊ शकतो.


योगीराज देवकर.

क्रमशः

मास्लो : २ :सुरक्षिततेच्या गरजा .

 *मानवाची दुसरी गरज* :

सुरक्षिततेच्या गरजा: (Safety Needs):

अब्राहम मॅस्लोच्या Theory of Needs Hierarchy मधील ही दुसरी गरज आहे.

शारीरिक व मानसिक सुरक्षितता, स्थैर्य, नोकरीची खात्री, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था इ. या गरजा पूर्ण झाल्यावर व्यक्तीला भविष्याबद्दल सुरक्षिततेची भावना मिळते.


पृथ्वीवर जीव निर्माण झाल्यापासूनच बहुतेक प्राणी,पक्षी एकमेकांपासून असुरक्षित आहेत.कारण ते एकमेकांवर अवलंबून राहून किंवा एकमेकांची शिकार करूनच जगत आले आहेत. आपण सुरक्षित कसे रहायचे हे मानवाला सर्व प्राण्यांच्या तुलनेत आधी उमगले असावे. यातूनच त्याची सुरक्षिततेची गरज मोठी होत गेली असावी .या पृथ्वीतलावरचा माणूस हा असा एकच प्राणी असेल ज्याने सगळ्या प्राणी ,पक्षांना असुरक्षित करून ठेवले आहे.

*आज माणूस, प्राणी आणि पक्षापासून सुरक्षित आहे पण सर्वात जास्त  माणसापासूनच असुरक्षित झाला आहे.*

चोऱ्या माऱ्या,दरोडे, सायबर क्राईम,खून,बलात्कार, मुला,मुलींची तस्करी,अघोरी कृत्य,अतिक्रमण,राजकारण,घुसखोरी,आतंकवाद,भ्रष्टाचार,युद्ध,राक्षसी महत्त्वाकांक्षा, इ. ऐकले,वाचले,पाहिले की,असे वाटते आज माणूसच माणसापासून असुरक्षित आहे.


आपला वर्तमान आणि भविष्य सुरक्षित रहावे असे प्रत्येकाला वाटते. जगभर इन्शुरन्स, लाइफ इन्शुरन्सचा बिझनेस यामुळेच फोफावला आहे. प्रत्येकाला पाहजे आहे पर्सनल स्पेस, सुदृढ शरीर, खात्रीचा जॉब किंवा व्यवसाय, स्थैर्य ,उत्तम आरोग्य, लहान मुले आणि महिलांची सुरक्षितता,  कायद्याचे संरक्षण आणि सुशासन.


शारीरिक,मानसिक सुरक्षेसाठी घर, घराला दार आणि लॉक,वॉचमन, सिक्युरिटी सर्विसेस, सीसी टीव्ही कॅमेरा,बँक, आर्थिक गुंतवणूक, जिम, अपघातापासून सुरक्षा, इ. असे शेकडो व्यवसाय केवळ माणसाच्या या सुरक्षिततेच्या गरजेतून निर्माण झाले आहेत.


एकदाका या गरजा पूर्ण झाल्या की,मनुष्य पुढच्या गरजेकडे मार्गाक्रमण करतो.

मास्लो : १:प्राथमिक गरजा .

 *माणसाच्या गरजा ...*


मॅसलोची गरजांची श्रेणी (Maslow’s Hierarchy of Needs) ही मानसशास्त्रज्ञ अब्राहम मॅसलो (Abraham Maslow) यांनी मांडलेली मानवी गरजांच्या प्रेरणांची शास्त्रीय संकल्पना आहे. या सिद्धांतानुसार माणसाच्या गरजा ठरावीक क्रमाने विकसित होतात व खालच्या पातळीच्या गरजा पूर्ण झाल्यावरच वरच्या पातळीच्या गरजा प्रभावी ठरतात. काहीजणांच्या बाबतीत हा क्रम बदलू पण शकतो.


*मानवाची पहिली गरज*:

शारीरिक गरजा: (Physiological Needs):

या प्राथमिक ,मूलभूत आणि जैविक गरजा आहेत—ऑक्सिजन,पाणी,अन्न,निवारा, झोप, योग्य तापमान, सेक्स ,इ. जीवन टिकवण्यासाठी या गरजा अत्यावश्यक आहेत.या प्राथमिक बाबींशिवाय माणूस जिवंत राहूच शकत नाही.


यातले ऑक्सिजन,पाणी,योग्य तापमान या बाबी निसर्गानेच मुबलक उपलब्ध केल्या आहेत. जंगले,नद्या,समुद्र,जमीन यामुळे मुबलक अन्न पण उपलब्ध आहे. *अन्न उपलब्ध करण्यात शेती आणि शेतकरी अत्यंत महत्वाचा घटक आहे हे ही यानिमित्ताने लक्षात घ्यावे.* उद्योजक ऑक्सिजन,पाणी , कच्च्या मालापासून पेय,अन्नपदार्थ निर्माण करीत आहेत. पृथ्वीचे आपण मानावे तितके आभार कमीच पडतील. पृथ्वी एक्सेसच्या भोवती फिरते आहे त्यामुळे  दिवस आणि रात्र अनुभवता येत आहे.यामुळे मानवाची झोपेची नैसर्गिक सोयच झाली आहे. दिवसा काम करा,रात्री झोपा आणि संतुलित रहा.  पृथ्वी सूर्याभोवती फिरत आहे त्यामुळे ऋतुचक्र तयार झाले आहे. प्लॅटिनम,हिरे,माणिक,मोती,सोने,चांदी,लोखंड, अल्युमिनियम,तांबे,ऑईल,गॅस,पेट्रोल,डिझेल, सिमेंट, सर्व काही या पृथ्वीनेच दिलेले आहे. सेक्स जीवन टिकवण्यासाठी आणि मानवी वंश वाढवण्यासाठी आवश्यक आहे.


एकदा का या प्राथमिक गरजा पूर्ण झाल्या की,माणूस पुढच्या गरजांच्या श्रेणीच्या मागे लागतो.

आठवी सवय : आपला आतला आवाज शोधा.

 सवय आठ :

*"आपला आतला आवाज शोधा आणि इतरांना त्यांचा आतला आवाज शोधण्यासाठी प्रेरित करा!"*


स्टीफन कोवी यांचे "द 8th हॅबिट: फ्रॉम इफेक्टिव्हनेस टू ग्रेटनेस" हे पुस्तक आपल्याला आपले जीवन अधिक महान आणि समृद्ध बनवण्यासाठी मार्गदर्शन करते. आठवी सवय म्हणजे "आपला आतला  आवाज शोधा आणि इतरांना त्यांचा आतला आवाज शोधण्यास प्रेरित करा ! ".

Stephen Covey  या लेखकाची अनेक प्रसिद्ध पुस्तके आहेत. त्यातील 'Seven habbits of highly effective people'  आणि 'Eighth  habbit from

effectivness to greatness' ही मी वाचलेली आणि आवडलेली पुस्तके. 


*आठव्या सवयाचे मुख्य बिंदू:*


- आपला आतला आवाज शोधणे म्हणजे आपल्या अद्वितीय शक्ती, प्रतिभा आणि मूल्ये ओळखणे.

- आपला आतला आवाज हा एक प्रकारे आत्मशोध, आत्मप्रकाश, आत्मसाक्षात्कार,Self  realization,  Self actualization,  होय.

- खरे तुम्ही,अस्सल तुम्ही ,कसे आहात ?  ते ओळखणे आणि स्वतःची जी ओळख  लक्षात आली आहे ती सिद्ध करण्यासाठी स्वतःशी स्पर्धा करणे.

- स्वतःच्या अस्तित्वात असण्याचे कारण स्वतःच्या आणि  इतरांच्या दृष्टिकोनातून पाहणे , आयुष्यात इतरांसाठी असं काहीतरी करणे ज्यायोगे तुम्ही वारसा निर्माण कराल.

- इतरांना त्यांचा आतला आवाज शोधण्यास प्रेरित करणे म्हणजे त्यांना त्यांच्या पूर्ण क्षमतेसाठी सक्षम करणे. त्यांना त्यांची ओळख होण्यास सहाय्यभूत ठरणे.

- ही सवय आपल्याला अधिक महान आणि समृद्ध बनून पूर्णत्वास नेहते .


*आठव्या सवयाचे फायदे:*


- आपले जीवन अधिक अर्थपूर्ण आणि उद्देशपूर्ण बनते.

- आपले संबंध अधिक मजबूत आणि प्रेरणादायी होतात.

- आपल्याला आपल्या कामात अधिक आनंद आणि संतुष्टी मिळते.

- तुमचा ,तुमच्या घराण्याचा वारसा निर्माण होतो.


स्टीफन कोवी यांनी पुस्तकात अधोरेखित केलेली ही सवय आपल्याला आपले जीवन अधिक प्रभावी आणि महान बनवण्यासाठी प्रेरित करते.😊

योगीराज देवकर.

सवय सात : हत्यार धारदार करा,संतुलन सर्वोत्तम असते.

 सवय सात :

*हत्यार धारदार  करा, संतुलन सर्वोत्तम असते !*


स्टीफन कोवी यांच्या "द सेवन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल" पुस्तकातील एक प्रसिद्ध विचार आहे, "सॉ तेज करा". याचा अर्थ असा की, जीवनात जी आयुधे वापरावी लागतात ती तीक्ष्ण करा, संतुलित करा.

आपल्याला आपल्या जीवनातील चार  आयामांमध्ये संतुलन राखणे आवश्यक आहे: शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आत्मिक.


हत्यारे धारदार करण्याचे फायदे:

- आपले जीवन अधिक प्रभावी होते.

- आपल्याला अधिक ऊर्जा आणि प्रेरणा मिळते.

- आपले संबंध मजबूत होतात.

- आपल्याला अधिक आत्मविश्वास मिळतो.


*हत्यारे संतुलित करण्याचे आयाम:*

- *शारीरिक*: नियमित व्यायाम, पौष्टिक आहार आणि पुरेशी झोप.

- *मानसिक*: वाचन, लेखन आणि नवीन कौशल्ये शिकणे.

- *भावनिक*: संबंध मजबूत करणे,शुद्ध इच्छा बाळगणे,आत्मविश्वास वाढवणे आणि ताण तणाव व्यवस्थापन.

- *आत्मिक*: ध्यान, योग आणि जीवनाचा उद्देश शोधणे. तुमचे अस्तिवात असण्याचे प्रयोजन काय आहे ते शोधणे आणि तसे वागणे.


हत्यार धारदार करण्याचा प्रयत्न करा आणि आपले जीवन अधिक प्रभावी बनवा! 😊

सवय सहा : सिनर्जी : एकत्रितपणे अधिक चांगले

 सवय सहा :

*सिनर्जी: एकत्रितपणे अधिक चांगले!*


स्टीफन कोवी यांच्या "द सेवन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल" पुस्तकातील एक प्रसिद्ध विचार आहे, "सिनर्जी: एकत्रितपणे अधिक चांगले!". याचा अर्थ असा की जेव्हा दोन किंवा अधिक लोक एकत्रितपणे काम करतात, तेव्हा ते एकत्रितपणे अधिक चांगले परिणाम प्राप्त करू शकतात.


सिनर्जी म्हणजे सहकार्य आणि एकत्रित प्रयत्नाने मिळणारे परिणाम जे वैयक्तिक प्रयत्नांपेक्षा अधिक चांगले असतात. हे विविधता आणि परस्पर आदरावर आधारित असते .


*सिनर्जीचे फायदे:*


- अधिक चांगले निर्णय घेता येतात.

- विविधता आणि नवोपक्रम वाढतो.

- संबंध मजबूत होतात.

- अधिक चांगले परिणाम मिळतात.

- एकांडा शिलेदार बनू नका, समूहितकेचे महत्व जाणा .


तर, आजपासूनच सिनर्जीचा अभ्यास करा आणि एकत्रितपणे अधिक चांगले परिणाम प्राप्त करा!😊

सवय पाच : प्रथम समजून घ्या,नंतर समजावून सांगा.

 सवय पाच :

*प्रथम समजून घ्या, नंतर समजावून सांगा!*


स्टीफन कोवी यांच्या "द सेवन  हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल" या पुस्तकातील एक प्रसिद्ध विचार आहे, "प्रथम समजून घ्या, नंतर समजावून सांगा". याचा अर्थ असा की आपल्याला दुसऱ्याचे म्हणणे समजून घेण्यासाठी प्रथम प्रयत्न करावा, नंतर आपले म्हणणे सांगावे.


हे एक शक्तिशाली विचार आहे जो आपल्याला अधिक प्रभावी संवादक बनण्यास मदत करू शकतो. जेव्हा आपण प्रथम समजून घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्याला दुसऱ्याच्या दृष्टिकोनाची कदर होते आणि आपले संबंध मजबूत होतात.


*प्रथम समजून घेण्याचे फायदे:*


- आपले संबंध मजबूत होतात.

- आपल्याला अधिक माहिती मिळते.

- आपल्याला अधिक चांगले निर्णय घेता येतात.

- आपल्याला अधिक आत्मविश्वास मिळतो.

- आपल्या एक तोंड आणि दोन कान दिले आहेत ते एकपट बोलायला आणि दुप्पट ऐकायला दिले आहेत.


तर, आजपासूनच प्रथम समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि आपले जीवन अधिक प्रभावी बनवा! 😊