गुणांबद्दल बोलू काही !
स्वाधिष्ठान चक्र : दुसरे चक्र.
स्वाधिष्ठान चक्र मानवी सृजनशीलतेचे आणि नवनिर्मितीचे ऊर्जाकेंद्र आहे.मानवी जीवन केवळ जगण्यासाठी नाही, तर घडवण्यासाठी आहे. विचार करणे,कल्पना करणे,समस्या सोडविणे, अनुभवातून शिकणे, नव्याने काही निर्माण करणे आणि त्या निर्मितीतून सौंदर्य अनुभवणे—ही मानवी अस्तित्वाची खरी ओळख आहे. या साऱ्या प्रक्रियेचे सूक्ष्म ऊर्जाकेंद्र म्हणजे स्वाधिष्ठान चक्र होय.
स्वाधिष्ठान चक्र मानवाच्या सृजनात्मक शक्तीचे, नवनिर्मितीचे, शुद्ध,निर्मळ, भावनात्मक विचारांचे आणि सौंदर्यबोधाचे केंद्र आहे. हे चक्र संतुलित असले की माणूस केवळ यांत्रिक जीवन न जगता, संवेदनशील, सर्जनशील आणि आनंददायी जीवन जगतो.
१) सृजनात्मकता :
सृजनात्मकता म्हणजे काहीतरी नवीन शक्यता निर्माण करण्याची क्षमता. ती केवळ चित्रकला, संगीत किंवा साहित्यापुरती मर्यादित नसून, इतरांचे प्रश्न,
समस्या सोडवणे,
नवे विचार,नव्या कल्पना मांडणे,
दैनंदिन जीवनात नाविन्य आणणे,
नाती समजून घेणे,
या सर्व ठिकाणी कार्यरत असते.
स्वाधिष्ठान चक्र जागृत असेल तर माणूस नुसता अनुकरण करणारा न राहता निर्मिती करणारा बनतो. इतिहासातील महान शास्त्रज्ञ, कलाकार, संशोधक हे सर्व स्वाधिष्ठान चक्राच्या गुणांची जिवंत उदाहरण आहेत. सृजनात्मकतेशिवाय मानवी प्रगतीच शक्य नाही—म्हणूनच हा गुण मानवासाठी अत्यंत आवश्यक आहे.
२) नवनिर्मिती :
नवनिर्मिती म्हणजे जुन्याला नाकारून नव्याचा स्वीकार करणे नव्हे, तर अनुभवातून अधिक परिपूर्ण गोष्ट घडवणे.
स्वाधिष्ठान चक्र व्यक्तीला
कल्पनाशक्ती देते,
प्रयोगशील बनवते,
भीतीपेक्षा शक्यतेकडे पाहायला शिकवते,
आजच्या वेगवान, बदलत्या जगात जो माणूस नवनिर्मिती करू शकतो तोच टिकतो. नवनिर्मिती ही केवळ उद्योग, तंत्रज्ञानापुरती मर्यादित नसून विचार, शिक्षण, नातेसंबंध आणि समाजरचना यांनाही आकार देते. त्यामुळे स्वाधिष्ठान चक्राचा हा गुण मानवी उत्क्रांतीसाठी अनिवार्य ठरतो.
३) भावनात्मक विचार : बुद्धी आणि हृदय यांचा समतोल.भावना नसतील तर माणूस कोरडा आणि कठोर बनतो; फक्त भावना असतील तर तो अस्थिर होतो.
स्वाधिष्ठान चक्र शुद्ध,निर्मळ भावनांना विचारांची दिशा देते.
यामुळे व्यक्ती
इतरांच्या भावनांची कदर करते,
सहानुभूती आणि करुणा विकसित करते,
स्वतःच्या भावना समजून घेत नियंत्रित करते,
भावनात्मक विचारामुळेच नाती टिकतात, समाज जुळून राहतो आणि माणूस माणसाशी जोडला जातो. हा गुण नसता तर मानवी जीवन केवळ व्यवहारिक आणि निर्जीव झाले असते.
४) सौंदर्याची जाण :
सौंदर्य म्हणजे फक्त बाह्य आकर्षण नाही, तर
विचारातील सौंदर्य,
आचरणातील सौंदर्य,
शब्दातील माधुर्य,
कृतीतील समतोल.
स्वाधिष्ठान चक्रामुळे माणूस निसर्ग, कला, संगीत, साहित्य आणि जीवनातील सूक्ष्म आनंद अनुभवू शकतो. सौंदर्याची जाण माणसाला आनंदी, शांत आणि समाधानशील बनवते. जीवन केवळ जबाबदाऱ्यांचे ओझे न राहता एक सुंदर प्रवास बनतो.
थोडक्यात, जेव्हा हे चक्र शुद्ध असते, योग्य प्रकारे कार्य करते, तेव्हा माणूस केवळ जगत नाही—तो घडवत राहतो, हे जग आहे त्यापेक्षा सुंदर करण्यासाठी कार्यरत राहतो आणि अर्थपूर्ण जीवन जगतो.
कुंडलिनी जागृतीनंतर जेव्हा ही शक्ती या चक्रातून प्रवाहित होते, तेव्हा माणसाच्या जीवनात नवनिर्मिती, सौंदर्यबोध आणि संतुलित भावना सहज प्रकट होऊ लागतात.
सृजनात्मकता अहंकारातून नसून निर्मळ प्रेरणेतून उत्पन्न होते—म्हणजेच “मी करतो.” या भावनेऐवजी “हे आपोआप घडते.” अशी सहज अवस्था निर्माण होते.
या चक्राचे संतुलन असल्यास भावना अतिरेक न होता विचारांशी जोडल्या जातात. त्यामुळे व्यक्ती संवेदनशील, सहानुभूतीशील आणि सौम्य बनते. यालाच भावनात्मक परिपक्वता असे म्हटले जाते. भावना शुद्ध झाल्या की नाती शुद्ध होतात आणि जीवनात शांतता प्रस्थापित होते.
संदर्भ - परम पूज्य माताजी श्री निर्मला देवी प्रणित सहजयोग.
आध्यात्मिक उन्नतीसाठी संपर्क करा -
Sahajayogapune.org
Sahajayogamumbai.org
लेखन - योगीराज देवकर.