Monday, 23 February 2026

सहजयोग

 जय श्री माताजी!


परम पूज्य माताजी श्री निर्मला देवी यांनी मानवजातीला दिलेली भव्य भेट म्हणजे सहजयोग. श्री माताजींनी जगाला सहजयोग दिला ,आता तो घेण्याची जबाबदारी आपली आहे.

( २१ मार्च १९२३ - २३ फेब्रुवारी २०११)


सहजयोग हा, कुंडलिनी जागृती, आत्मसाक्षात्कार,

निर्विचार समाधी, अंतर्गत शुद्धी आणि सामूहिक  वैश्विक दैवी चैतन्य यांवर आधारित आहे. 


सदर आध्यात्मिक ज्ञान अनुभवप्रधान आहे—इथे विश्वासापेक्षा अनुभूतीला प्राधान्य आहे.


1) आत्मसाक्षात्कार –हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध अधिकार आहे.

“Self-realization is not a myth; it is your right.”

मानवामध्ये सुप्त असलेली कुंडलिनी शक्ती जागृत होऊन सहस्त्रारातून आत्मसाक्षात्कार देते—हा प्रत्यक्ष अनुभव आहे.


2) कुंडलिनी जागृती – सहज, सुरक्षित आणि नैसर्गिक.

कठोर साधना, तप, संन्यास आवश्यक नाही.

सहज (Spontaneous) पद्धतीने, गुरुकृपेने कुंडलिनी जागृत होते.


3) निर्विचार समाधी (Thoughtless Awareness)

विचारांच्या पलीकडे जाणे म्हणजेच ध्यान.

या अवस्थेत:

मन शांत

चित्त प्रसन्न

अंतःकरण शुद्ध

आत्म्याशी प्रत्यक्ष संपर्क.


4) अद्वैताचा प्रत्यक्ष अनुभव

आत्मा आणि परमात्मा यांचे ऐक्य अनुभवाने कळते.

हे तत्त्वज्ञान विवादाने नव्हे, अनुभूतीने सिद्ध होते.


5) चक्र आणि नाड्यांचे ज्ञान

मानव देहातील सात चक्रे आणि तीन नाड्या शुद्ध झाल्या की:

शारीरिक,

भावनिक,

बौध्दिक,

आध्यात्मिक, संतुलन प्राप्त होते.


6) नैतिकता – परिणाम म्हणून: नियम म्हणून नव्हे,

नैतिकता उपदेशातून नव्हे, तर आत्मसाक्षात्कारानंतर नैतिकता स्वाभाविकपणे प्रकट होते.

अहंकार व सुप्तगंड (ego–superego) संतुलित होतात.


7) सामूहिक चेतना (Collective Consciousness)

स्वतःच्या प्रगतीबरोबरच सर्वांच्या कल्याणाची जाणीव निर्माण होते.

स्वार्थातून विश्वार्थाकडे प्रवास होतो.


8) सर्वधर्मसमन्वय: 

श्री माताजींनी सर्व धर्मगुरूंना एकाच उत्क्रांतीच्या प्रवासातील अवतार मानले आहे—

त्यांचे सार सहजयोगात अनुभवास येते. Sahajayoga is best of all religions .


9) वैज्ञानिक आणि सार्वत्रिक अध्यात्म

सहजयोग:

अंधश्रद्धा नाही,

पैसे लागत नाहीत,

सदस्यत्व नाही,

सर्व मानवांसाठी खुले.


थोडक्यात सारांश

माताजी श्री निर्मला देवी यांचे तत्त्वज्ञान म्हणजे—

“आत्मसाक्षात्काराद्वारे सत्याचा प्रत्यक्ष अनुभव.”

“तुम्ही आत्मा आहात—हे जाणणे नव्हे, अनुभवणे.”

“जागतिक परिवर्तन स्वतःच्या अंतर्गत परिवर्तनातून.”


जय श्री माताजी!

Thursday, 19 February 2026

सहस्त्रार् चक्र

 गुणांबद्दल बोलू काही!

सहस्त्रार चक्र : सातवे चक्र.


सहस्त्रार चक्र सर्व चक्रांचे संयोगबिंदू आहे. इथेच व्यक्तीचा अहं आणि चित्त विलीन होऊन परम चैतन्याशी एकरूप होते .


या चक्राचे प्रमुख गुण एकाकारिता, समग्रता, शांती आणि निरानंद हे आहेत. 


१) एकाकारिता: (Integration / Oneness):


एकाकारिता म्हणजे आतल्या आणि बाहेरच्या जीवनात असलेली तूट नाहीशी होणे. ज्ञान, भावना आणि कृती यांच्यात समन्वय निर्माण होतो. “मी” आणि “ते” असा भेद कमी होत जातो.आत्मा आणि परमात्मा यांच्या भेटीचा योग येतो .


विभक्त मनामुळे संघर्ष, दुटप्पीपणा व अस्वस्थता निर्माण होते. सहस्त्रारातील एकाकारिता व्यक्तीला समग्र, प्रामाणिक आणि नैसर्गिक बनवते.


२)समग्रता: (Wholeness):


समग्रता म्हणजे जीवनाकडे तुकड्यांत नव्हे तर पूर्णतेने पाहण्याची क्षमता. सहस्त्रार चक्र खुले झाल्यानंतर मनुष्य केवळ स्वतःच्या फायद्यापुरता विचार करत नाही; तो व्यापक कल्याणाचा दृष्टिकोन स्वीकारतो.


३) शांती :(Inner Peace):


सहस्त्रार चक्राचा सर्वात जाणवणारा गुण म्हणजे अंतःशांती. ही शांती बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसते.


४) निरानंद :(Nirānand / Thoughtless Bliss):


निरानंद म्हणजे कारणाशिवाय येणारा, विचारांच्या पलीकडचा आनंद. हा भौतिक सुखासारखा क्षणभंगुर नसतो.


माणूस सतत आनंदाचा शोध बाहेर घेतो—संपत्ती, प्रतिष्ठा, नातेसंबंध यांत. निरानंद अनुभवलेला मनुष्य मात्र आतून तृप्त असतो. त्यामुळे त्याच्यात लोभ, भीती व असुरक्षितता कमी होते आणि जीवन सहज, निर्मळ बनते.


संदर्भ - परम पूज्य माताजी श्री निर्मला देवी प्रणित सहजयोग.

आध्यात्मिक उन्नतीसाठी संपर्क करा .

Sahajayogapune.org 

Sahajayogamumbai.org 


लेखन - योगीराज देवकर.

Wednesday, 18 February 2026

आज्ञा चक्र

 गुणांबद्दल बोलू काही!

आज्ञा चक्र : सहावे चक्र.


क्षमाशीलता हा गुण मानवी उत्क्रांतीचा मौन द्वार आहे.आज्ञा चक्र  विचारांच्या पलीकडील शांततेचे, अहंकार-प्रति अहंकाराच्या  अतिक्रमणाचे आणि क्षमाशीलतेचे केंद्र आहे.


क्षमाशीलता म्हणजे दुर्बलता नव्हे, ती आंतरिक सामर्थ्याची, परिपक्वतेची आणि जागरूकतेची निशाणी आहे. क्षमा म्हणजे अन्यायाचे समर्थन करणे नव्हे, तर डोक्यातला भार सोडून देणे, भूतकाळातील जखमांपासून स्वतःला मुक्त करणे होय.


आज्ञा चक्रावर दोन मोठे अडथळे असतात—

अहंकार (Ego) : “मी बरोबर, तू चूक.”

प्रति अहंकार , ममत्व (Superego) : अपराधभाव, दु:ख, भूतकाळातील साठलेली वेदना.

जेव्हा आपण क्षमा करत नाही, तेव्हा हे इगो, कंडिशनिंग हे अडथळे अधिक घट्ट होतात आणि कुंडलिनीचा प्रवाह आज्ञा चक्रावर अडकतो. परिणामतः मन अस्वस्थ होते , विचार अतिरेकाकडे वळतातआणि ध्यानात अडथळे निर्माण होतात.


श्रीमाताजी स्पष्टपणे सांगतात —

“क्षमाशीलता ही सर्वात मोठी शक्ती आहे.”

क्षमा केल्याने आज्ञा चक्र तत्क्षणी मोकळे होते,इगो,सुपर इगोचा फुगा फुटतो ,कुंडलिनी सहजपणे सहस्राराकडे जाते,विचार थांबतात, निर्विचार समाधीचा अनुभव येतो,

अंतर्मन शांत, हलके व आनंदी होते.


मानसिक आरोग्यासाठी

राग, द्वेष, आकस हे दीर्घकाळ मनात साठले तर ताणतणाव, असंतोष, नैराश्य निर्माण होते. क्षमा ही यावरचे नैसर्गिक औषध आहे.


क्षमाशील व्यक्ती सहजपणे साक्षीभावात स्थिर राहते. क्षमेमुळे नाती तुटत नाहीत; ती अधिक परिपक्व व नि:स्वार्थ होतात.


जिथे क्षमा आहे तिथे संघर्ष टिकत नाही. वैयक्तिक क्षमा हीच सामाजिक शांतीची बीजं पेरते.


क्षमेशिवाय ध्यान खोल जात नाही,

क्षमेशिवाय आत्मसाक्षात्कार स्थिर राहत नाही,

क्षमेशिवाय सहज आनंदाचा अनुभव क्षणिक ठरतो.

म्हणूनच आज्ञा चक्राच्या शुद्धीकरणासाठी सहजयोगात प्रथमच सांगितले जाते : म्हणा

“मी सर्वांना मनापासून क्षमा केली आहे .”आणि "हे परमेश्वरा,माझ्याकडून कळत ,नकळत , जाणते, अजाणतेपणी ज्या चुका झाल्या असतील त्यासाठी मला क्षमा कर."


संदर्भ - परम पूज्य माताजी श्री निर्मला देवी प्रणित सहजयोग.

आध्यात्मिक उन्नतीसाठी संपर्क करा -

Sahajayogapune.org 

Sahajayogamumbai.org 


लेखन - योगीराज देवकर.

विशुद्धी चक्र

 गुणांबद्दल बोलू काही !

विशुद्धी चक्र: पाचवे चक्र.


मानवी सूक्ष्म शरीरातील विशुद्धी चक्र हे कंठप्रदेशात स्थित असून, ते संवाद, अभिव्यक्ती, सामूहिकता आणि साक्षीभाव यांचे केंद्र मानले जाते. व्यक्तीची अंतर्गत शुद्धता आणि बाह्य व्यवहार यांचा सेतू म्हणून विशुद्धी चक्र कार्य करते. या चक्राचे संतुलन म्हणजे केवळ चांगली वाणी नव्हे, तर शुद्ध विचार, सत्यनिष्ठ कृती आणि सामूहिक चेतनेशी जोडलेपण होय.


१) सामूहिकता:


विशुद्धी चक्राचा सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे सामूहिकता. “मी”पणातून “आपण”कडे नेणारी ही चेतना आहे. व्यक्ती स्वतःला समाजाचा, कुटुंबाचा, राष्ट्राचा , संपूर्ण विश्वाचा ,आणि अखेरीस संपूर्ण मानवजातीचा भाग समजू लागते. याचा आध्यात्मिक अर्थ म्हणजे आत्मा परमात्म्याशी सामूहिक होणे.सामूहिकतेमुळे अहंकार विरघळतो, मतभेद कमी होतात आणि सहकार्य, सहानुभूती व समन्वय वाढतो. 


२) साक्षीभाव:


साक्षीभाव म्हणजे परिस्थिती, भावना व विचार यांना आसक्त न होता निरीक्षण करण्याची क्षमता. विशुद्धी चक्र शुद्ध असले की व्यक्ती प्रतिक्रिया देण्याऐवजी प्रतिसाद देऊ लागते.

यामुळे मानसिक स्थैर्य, विवेक आणि शांतता प्राप्त होते. साक्षीभावामुळे व्यक्ती नात्यांमध्ये समतोल राखते, वाद टाळते आणि सत्याला समजून घेण्याची क्षमता वाढवते.


३) बोलण्यातील माधुर्य:


शब्द हे केवळ ध्वनी नसून ते ऊर्जा वाहक असतात. विशुद्धी चक्र संतुलित असले की वाणीत माधुर्य, नम्रता आणि सौम्यता येते.

अशा व्यक्तीची वाणी मनाला स्पर्श करते, संघर्ष शमवते आणि विश्वास निर्माण करते. कठोर सत्यसुद्धा प्रेमपूर्वक मांडण्याची कला याच चक्रातून विकसित होते.


४) व्यवहार चातुर्य व संपर्क कुशलता: 


विशुद्धी चक्र व्यक्तीला योग्य वेळी ,योग्य शब्द,योग्य पद्धतीने सुसंवाद साधण्याची बुद्धी देते.

यामुळे  सामाजिक स्वीकार, नातेसंबंधांची दृढता आणि व्यावसायिक यश वाढते. संवादातील स्पष्टता गैरसमज टाळते व विश्वास निर्माण करते.


५) कुटनितिज्ञता: (राजनैतिक/सामाजिक सूज्ञता):


कुटनितिज्ञता म्हणजे फसवणूक नव्हे, तर परिस्थितीची अचूक जाण ठेवून शहाणपणाने वागण्याची क्षमता. विशुद्धी चक्र जागृत असलेली व्यक्ती शब्दांचा गैरवापर न करता, सत्याशी प्रामाणिक राहूनही परिस्थिती हाताळू शकते.

हा गुण

कौटुंबिक,सामाजिक समन्वय, प्रशासन आणि नेतृत्व यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतो.


६) सत्यनिष्ठा: 


येथे सत्य म्हणजे केवळ खोटे न बोलणे नव्हे, तर विचार, बोलणे आणि कृती यातील एकरूपता होय .

सत्यनिष्ठ व्यक्तीवर समाज विश्वास ठेवतो.  अंतःकरणात अपराधभाव नसल्याने मानवाचे जीवन हलके, निर्भय व आनंदी होते.


संदर्भ - परम पूज्य माताजी श्री निर्मला देवी प्रणित सहजयोग.

आध्यात्मिक उन्नतीसाठी संपर्क करा -

Sahajayogapune.org 

Sahajayogamumbai.org 


लेखन - योगीराज देवकर.

Tuesday, 17 February 2026

अनाहत चक्र

 गुणांबद्दल बोलू काही !

अनाहत चक्र: चौथे चक्र.


मानवी सूक्ष्म शरीरातील अनाहत चक्र हे हृदयात स्थित असून ते प्रेम, धैर्य, समतोल आणि मानसिक व शारीरिक रोग प्रतिकार शक्तीचे प्रतीक मानले जाते. “अनाहत” म्हणजे न वाजवता निर्माण होणारा नाद.


१) निर्भयता: (Fearlessness):


अनाहत चक्राचे सर्वात महत्त्वाचे गुणधर्म म्हणजे निर्भयता. जेव्हा हे चक्र शुद्ध ,संतुलित असते, तेव्हा व्यक्ती बाह्य परिस्थितींना घाबरत नाही. भीती ही बहुतांश वेळा असुरक्षिततेतून जन्माला येते; परंतु अनाहत चक्र मजबूत असेल तर मनाला अंतर्गत आधार मिळतो.

ही निर्भयता आक्रमक नसून शांत धैर्याची असते—जी संकटातही विवेक टिकवते, योग्य निर्णय घेण्यास मदत करते आणि जीवनात स्थैर्य आणते.


२) आत्मविश्वास: (Self-Confidence):


खरा,रास्त आत्मविश्वास अहंकारातून नव्हे, तर स्वतःच्या अस्तित्वावरील श्रद्धेतून निर्माण होतो. अनाहत चक्र संतुलित असताना व्यक्ती स्वतःला

आपल्या मर्यादा, सामर्थ्य आणि भावनांसह स्वीकारते. हा आत्मविश्वास तुलना न करता स्वतःच्या मूल्याची जाणीव करून देतो. त्यामुळे व्यक्ती इतरांवर अवलंबून न राहता निर्णय घेऊ शकते, नातेसंबंधात प्रामाणिक राहते आणि जीवनात सकारात्मक दृष्टीकोन विकसित करते.


३) रोगप्रतिकारकता: (Immunity):


अनाहत चक्राचा थेट संबंध हृदय, फुफ्फुसे, रक्ताभिसरण प्रणाली आणि रोगप्रतिकारक शक्तीशी जोडला जातो. सतत भीती, ताणतणाव, दु:ख किंवा भावनिक दडपण असल्यास हे चक्र दुर्बल होते आणि त्याचा परिणाम शारीरिक आरोग्यावर दिसून येतो.

भावनिक स्थैर्य, अंतर्गत शांतता आणि सकारात्मक भावना रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. त्यामुळे शुद्ध, संतुलित अनाहत चक्र हे केवळ मानसिकच नव्हे, तर शारीरिक आरोग्याचेही रक्षणकर्ते ठरते.


आजच्या धावपळीच्या, स्पर्धात्मक आणि अनिश्चित जगात भीती, अस्थिरता व ताणतणाव सामान्य झाले आहेत. अशा वेळी अनाहत चक्राचे गुण मानवाला—

भावनिक संतुलन,

मानसिक स्थैर्य,

आरोग्यदायी शरीर,

नातेसंबंधात सुसंवाद

आणि जीवनाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन

देण्यासाठी अत्यंत आवश्यक ठरतात. निर्भयता मनाला मुक्त करते, आत्मविश्वास व्यक्तिमत्त्वाला बळ देते आणि रोगप्रतिकारकता शरीराला सक्षम बनवते—ही तिन्ही मूल्ये परस्परपूरक आहेत.


संदर्भ - परम पूज्य माताजी श्री निर्मला देवी प्रणित सहजयोग.

आध्यात्मिक उन्नतीसाठी संपर्क करा -

Sahajayogapune.org

Sahajayogamumbai.org 


लेखन - योगीराज देवकर.

Monday, 16 February 2026

भवसागर

 गुणांबद्दल बोलू काही!


भवसागर , Void :


मानवाचे जीवन म्हणजे केवळ शारीरिक,भौतिक जीवन जगण्याचा प्रवास नसून, तो एक भवसागर पार करण्याचा प्रवास आहे. भव + सागर = भवसागर

याचा अर्थ ,

जन्म-मृत्यू, सुख-दुःख, मोह-माया यांनी भरलेला संसाररूपी अथांग सागर .संसारातील दुःख, भ्रम, आसक्ती आणि अज्ञान यांचे प्रतीक. जीवनात ही पोकळी भरून काढायची असेल तर त्यासाठी आवश्यक आहे कुंडलिनी जागृती द्वारा आत्मसाक्षात्कार. मणिपूर चक्राच्या भागात, भवसागरात सुषुम्ना नाडी खंडित झालेली असते. आत्मसाक्षात्कारानंतर स्वतः कुंडलिनी ही खंडित नाडी जोडण्याचे कार्य करते आणि ही पोकळी भरून काढते.


धर्माचे ज्ञान : धर्म म्हणजे बाह्य नियम नव्हेत, तर अंतर्गत शुद्धी,संतुलन आहे. जेव्हा कुंडलिनी शक्ती मणिपूर चक्र पार करते, तेव्हा मानवाच्या चेतनेत खरा धर्म प्रस्थापित होतो. हा धर्म आत्मजाणिवेवर आधारित असतो. तेथे “मी करतो.” हा अहंकार विरघळतो आणि “हे घडते आहे.” अशी सहज अवस्था प्राप्त होते.


मूल्ये - तत्त्वे आणि मानवी जीवनाचे गुणधर्म असलेल्या दहा आज्ञा ( Ten Commandments) ही बंधने नसून, स्वतःच्या अंतःशुद्धीची साधने आहेत.


धैर्य : कुंडलिनी जागृत झाल्यानंतर येणाऱ्या धैर्यामुळे अंतर्गत बदलांना स्वीकारण्याचे सामर्थ्य लाभते. धैर्यामुळे साधक जीवनात स्थिरावतो.


क्षमा : मानवातील अत्यंत महत्त्वाचा गुण. “मी सर्वांना क्षमा केली .” या भावनेने आज्ञा चक्र खुलते आणि कुंडलिनीचा प्रवाह सुलभ होतो.


शांती : निर्विचार समाधीची अवस्था. विचार,प्रतिक्रिया थांबले की शांती सहज प्रकट होते.


चोरी न करणे (अस्तेय) : इतरांच्या  श्रेयावर , शक्तीवर, संपत्तीवर  अधिकार न गाजवणे. 'माझं ते माझं आणि तुझं ते पण माझं', असे न वागणे. मनातही चोरीचा ,भ्रष्टाचाराचा विचार न येणे,  चोर न बनणे हा सूक्ष्म स्तरावरील धर्म आहे.


पवित्रता : पवित्रता म्हणजे केवळ शारीरिक नव्हे, तर भावनिक,बौद्धिक,आत्मिक, स्वच्छता.


संयम : इंद्रियांवर नव्हे, तर इच्छां,भावना ,षडरिपुवर 

 प्रभुत्व.


बुद्धी (विवेक) : चैतन्याच्या आधारे योग्य-अयोग्य, चुक- बरोबर , करावे - करू नये , ओळखण्याची क्षमता.


विद्या : सहजज्ञान म्हणजे तुमची वर्तणूक, मनोवृत्ती,भावना, सर्वसाधारण दृष्टिकोन, खरे तुम्ही असे स्वतः 

स्वतःलाच ओळखल्यामुळे समजणे. जाणीव होणे.


सत्य : तुम्ही आत्मा आहात हे सर्वात मोठे सत्य आहे . नेहमी सत्याच्या मार्गावर चालणे.


अक्रोध : क्रोधाचा अभाव नव्हे, तर अहंकाराचा क्षय. 


मानवी सूक्ष्म शरीरातील तीन नाड्या संतुलन आणि चक्र शुद्धीशिवाय मूल्ये आत्मसात होत नाहीत. बाह्य प्रयत्नांनी काही काळ नैतिकता पाळता येते, पण कुंडलिनी जागृतीनंतर ही मूल्ये स्वभावाचा ,धर्माचा भाग बनतात. मग सत्य बोलण्यासाठी प्रयत्न करावा लागत नाही, क्षमा आपोआप घडते, आणि संयम सहज प्रकट होतो.


“तुम्ही ,मन,बुद्धी,शरीर,अहंकार ,इ.काहीही नसून केवळ  आत्मा आहात.”

ही जाणीव दृढ झाली की जीवन आपोआप धर्ममय, शांतीमय आणि आनंदमय होते.


संदर्भ - परम पूज्य माताजी श्री माताजी देवी प्रणित सहजयोग.

आध्यात्मिक उन्नतीसाठी संपर्क करा.

Sahajayogapune.org 

Sahajayogamumbai.org 


लेखन - योगीराज देवकर.

Sunday, 15 February 2026

मणिपूर चक्र : तिसरे चक्र.

 गुणांबद्दल बोलू काही!

मणिपूर चक्र : तिसरे चक्र.


मानव हा केवळ देह-भावना-बुद्धी यांचा संयोग नसून, तो एक सूक्ष्म ऊर्जासंरचनेने युक्त चेतन अस्तित्व आहे. या सूक्ष्म प्रणालीतील सात प्रमुख चक्रांपैकी मणिपूर (नाभी) चक्र हे मानवी जीवनाच्या धर्म, नीती आणि आंतरिक संतुलनाचे केंद्र आहे.नाभी चक्राला धर्मचक्र संबोधले जाते , कारण याच ठिकाणी मानवी आचरणाचे योग्य-अयोग्य मोजमाप घडते.


मणिपूर चक्र नाभी प्रदेशात स्थित असून, ते

प्लीहा (Spleen)

यकृत (Liver)

स्वादुपिंड (Pancreas)

पचनसंस्था

यांच्याशी सूक्ष्म पातळीवर जोडलेले आहे.


या चक्राचे संतुलन बिघडल्यास असंतोष, चिडचिड, लोभ, अति-विचार आणि भावनिक अस्थिरता वाढते.


मणिपूर चक्राचे गुण:

१) संतोष : 

संतोष म्हणजे स्थितप्रज्ञ अवस्था—जिथे मन वर्तमान क्षणात स्थिर असते.कुंडलिनी नाभी चक्रातून शांतपणे वाहू लागली की ध्यानात एक अनुभव येतो:

पोट हलके वाटते,

गरजांबद्दल अति विचार राहत नाही,

“मला अजून हवे.” ही अस्वस्थता कमी होते.

हा संतोष बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसतो; तो आतून प्रकट होतो.


२) समाधान : 

समाधान म्हणजे कर्म आणि धर्म यांचा समन्वय.

मणिपूर चक्र शुद्ध असताना व्यक्ती,

कर्तव्य नीट पार पाडते,

अपेक्षारहित काम करते,

ध्यानानंतर अंतर्मनात शांती अनुभवते,हे समाधान अहंकारातून येत नाही, तर साक्षीभावातून जन्माला येते.


३) करुणा : 

धर्म म्हणजे इतरांवर प्रभुत्व नव्हे, तर अंतःकरणातून उमलणारी करुणा.

मणिपूर चक्र जागृत झाल्यावर करुणा सहज प्रकट होते:

दुसऱ्याचे दुःख पाहून मन अस्वस्थ होते,

मदतीची प्रेरणा आतून येते,

कोणताही दिखावा न करता सेवा घडते.करुणेमुळेच समाजात समतोल व सुसंवाद निर्माण होतो.


४) प्रेम : 

मणिपूर चक्रातील प्रेम हे

आसक्तीविरहित,

अपेक्षारहित,

अधिकाररहित,

असते.

ध्यानामुळे रागाची तीव्रता कमी होते,

नात्यांमध्ये मृदुता येते,

“माझेच बरोबर.” ही धारणा सैल होते.मणिपूर चक्र शुद्ध नसेल तर हृदयाचे प्रेमही शुद्ध स्वरूपात प्रकट होत नाही.


५) उत्क्रांती : 

उत्क्रांती म्हणजे

जाणीवेचा विस्तार.

मणिपूर चक्र संतुलित झाल्यावर:

“मी” कमी होतो

“आपण” प्रकट होते,

व्यक्ती सामूहिकतेशी जोडली जाते,

कुंडलिनी नाभी चक्रातून वर चढताना साधकाला ध्यानात आंतरिक स्थैर्य व निश्चल आनंद अनुभवायला मिळतो. हाच मानवी उत्क्रांतीचा खरा टप्पा आहे—बाह्य प्रगतीपेक्षा अंतर्गत परिवर्तन.


थोडक्यात ,मणिपूर चक्र—धर्माचा दीपस्तंभ,

संतोष, समाधान, करुणा, प्रेम आणि उत्क्रांती हे गुण नैतिक शिकवण नसून, मणिपूर चक्र शुद्ध झाल्यावर सहज प्रकट होणारी चेतना आहे.


संदर्भ - परम पूज्य माताजी श्री निर्मला देवी प्रणित सहजयोग.

आध्यात्मिक उन्नतीसाठी संपर्क करा -

Sahajayogapune.org

Sahajayogamumbai.org 


लेखन - योगीराज देवकर.