Monday, 16 February 2026

भवसागर

 गुणांबद्दल बोलू काही!


भवसागर , Void :


मानवाचे जीवन म्हणजे केवळ शारीरिक,भौतिक जीवन जगण्याचा प्रवास नसून, तो एक भवसागर पार करण्याचा प्रवास आहे. भव + सागर = भवसागर

याचा अर्थ ,

जन्म-मृत्यू, सुख-दुःख, मोह-माया यांनी भरलेला संसाररूपी अथांग सागर .संसारातील दुःख, भ्रम, आसक्ती आणि अज्ञान यांचे प्रतीक. जीवनात ही पोकळी भरून काढायची असेल तर त्यासाठी आवश्यक आहे कुंडलिनी जागृती द्वारा आत्मसाक्षात्कार. मणिपूर चक्राच्या भागात, भवसागरात सुषुम्ना नाडी खंडित झालेली असते. आत्मसाक्षात्कारानंतर स्वतः कुंडलिनी ही खंडित नाडी जोडण्याचे कार्य करते आणि ही पोकळी भरून काढते.


धर्माचे ज्ञान : धर्म म्हणजे बाह्य नियम नव्हेत, तर अंतर्गत शुद्धी,संतुलन आहे. जेव्हा कुंडलिनी शक्ती मणिपूर चक्र पार करते, तेव्हा मानवाच्या चेतनेत खरा धर्म प्रस्थापित होतो. हा धर्म आत्मजाणिवेवर आधारित असतो. तेथे “मी करतो.” हा अहंकार विरघळतो आणि “हे घडते आहे.” अशी सहज अवस्था प्राप्त होते.


मूल्ये - तत्त्वे आणि मानवी जीवनाचे गुणधर्म असलेल्या दहा आज्ञा ( Ten Commandments) ही बंधने नसून, स्वतःच्या अंतःशुद्धीची साधने आहेत.


धैर्य : कुंडलिनी जागृत झाल्यानंतर येणाऱ्या धैर्यामुळे अंतर्गत बदलांना स्वीकारण्याचे सामर्थ्य लाभते. धैर्यामुळे साधक जीवनात स्थिरावतो.


क्षमा : मानवातील अत्यंत महत्त्वाचा गुण. “मी सर्वांना क्षमा केली .” या भावनेने आज्ञा चक्र खुलते आणि कुंडलिनीचा प्रवाह सुलभ होतो.


शांती : निर्विचार समाधीची अवस्था. विचार,प्रतिक्रिया थांबले की शांती सहज प्रकट होते.


चोरी न करणे (अस्तेय) : इतरांच्या  श्रेयावर , शक्तीवर, संपत्तीवर  अधिकार न गाजवणे. 'माझं ते माझं आणि तुझं ते पण माझं', असे न वागणे. मनातही चोरीचा ,भ्रष्टाचाराचा विचार न येणे,  चोर न बनणे हा सूक्ष्म स्तरावरील धर्म आहे.


पवित्रता : पवित्रता म्हणजे केवळ शारीरिक नव्हे, तर भावनिक,बौद्धिक,आत्मिक, स्वच्छता.


संयम : इंद्रियांवर नव्हे, तर इच्छां,भावना ,षडरिपुवर 

 प्रभुत्व.


बुद्धी (विवेक) : चैतन्याच्या आधारे योग्य-अयोग्य, चुक- बरोबर , करावे - करू नये , ओळखण्याची क्षमता.


विद्या : सहजज्ञान म्हणजे तुमची वर्तणूक, मनोवृत्ती,भावना, सर्वसाधारण दृष्टिकोन, खरे तुम्ही असे स्वतः 

स्वतःलाच ओळखल्यामुळे समजणे. जाणीव होणे.


सत्य : तुम्ही आत्मा आहात हे सर्वात मोठे सत्य आहे . नेहमी सत्याच्या मार्गावर चालणे.


अक्रोध : क्रोधाचा अभाव नव्हे, तर अहंकाराचा क्षय. 


मानवी सूक्ष्म शरीरातील तीन नाड्या संतुलन आणि चक्र शुद्धीशिवाय मूल्ये आत्मसात होत नाहीत. बाह्य प्रयत्नांनी काही काळ नैतिकता पाळता येते, पण कुंडलिनी जागृतीनंतर ही मूल्ये स्वभावाचा ,धर्माचा भाग बनतात. मग सत्य बोलण्यासाठी प्रयत्न करावा लागत नाही, क्षमा आपोआप घडते, आणि संयम सहज प्रकट होतो.


“तुम्ही ,मन,बुद्धी,शरीर,अहंकार ,इ.काहीही नसून केवळ  आत्मा आहात.”

ही जाणीव दृढ झाली की जीवन आपोआप धर्ममय, शांतीमय आणि आनंदमय होते.


संदर्भ - परम पूज्य माताजी श्री माताजी देवी प्रणित सहजयोग.

आध्यात्मिक उन्नतीसाठी संपर्क करा.

Sahajayogapune.org 

Sahajayogamumbai.org 


लेखन - योगीराज देवकर.

Sunday, 15 February 2026

मणिपूर चक्र : तिसरे चक्र.

 गुणांबद्दल बोलू काही!

मणिपूर चक्र : तिसरे चक्र.


मानव हा केवळ देह-भावना-बुद्धी यांचा संयोग नसून, तो एक सूक्ष्म ऊर्जासंरचनेने युक्त चेतन अस्तित्व आहे. या सूक्ष्म प्रणालीतील सात प्रमुख चक्रांपैकी मणिपूर (नाभी) चक्र हे मानवी जीवनाच्या धर्म, नीती आणि आंतरिक संतुलनाचे केंद्र आहे.नाभी चक्राला धर्मचक्र संबोधले जाते , कारण याच ठिकाणी मानवी आचरणाचे योग्य-अयोग्य मोजमाप घडते.


मणिपूर चक्र नाभी प्रदेशात स्थित असून, ते

प्लीहा (Spleen)

यकृत (Liver)

स्वादुपिंड (Pancreas)

पचनसंस्था

यांच्याशी सूक्ष्म पातळीवर जोडलेले आहे.


या चक्राचे संतुलन बिघडल्यास असंतोष, चिडचिड, लोभ, अति-विचार आणि भावनिक अस्थिरता वाढते.


मणिपूर चक्राचे गुण:

१) संतोष : 

संतोष म्हणजे स्थितप्रज्ञ अवस्था—जिथे मन वर्तमान क्षणात स्थिर असते.कुंडलिनी नाभी चक्रातून शांतपणे वाहू लागली की ध्यानात एक अनुभव येतो:

पोट हलके वाटते,

गरजांबद्दल अति विचार राहत नाही,

“मला अजून हवे.” ही अस्वस्थता कमी होते.

हा संतोष बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसतो; तो आतून प्रकट होतो.


२) समाधान : 

समाधान म्हणजे कर्म आणि धर्म यांचा समन्वय.

मणिपूर चक्र शुद्ध असताना व्यक्ती,

कर्तव्य नीट पार पाडते,

अपेक्षारहित काम करते,

ध्यानानंतर अंतर्मनात शांती अनुभवते,हे समाधान अहंकारातून येत नाही, तर साक्षीभावातून जन्माला येते.


३) करुणा : 

धर्म म्हणजे इतरांवर प्रभुत्व नव्हे, तर अंतःकरणातून उमलणारी करुणा.

मणिपूर चक्र जागृत झाल्यावर करुणा सहज प्रकट होते:

दुसऱ्याचे दुःख पाहून मन अस्वस्थ होते,

मदतीची प्रेरणा आतून येते,

कोणताही दिखावा न करता सेवा घडते.करुणेमुळेच समाजात समतोल व सुसंवाद निर्माण होतो.


४) प्रेम : 

मणिपूर चक्रातील प्रेम हे

आसक्तीविरहित,

अपेक्षारहित,

अधिकाररहित,

असते.

ध्यानामुळे रागाची तीव्रता कमी होते,

नात्यांमध्ये मृदुता येते,

“माझेच बरोबर.” ही धारणा सैल होते.मणिपूर चक्र शुद्ध नसेल तर हृदयाचे प्रेमही शुद्ध स्वरूपात प्रकट होत नाही.


५) उत्क्रांती : 

उत्क्रांती म्हणजे

जाणीवेचा विस्तार.

मणिपूर चक्र संतुलित झाल्यावर:

“मी” कमी होतो

“आपण” प्रकट होते,

व्यक्ती सामूहिकतेशी जोडली जाते,

कुंडलिनी नाभी चक्रातून वर चढताना साधकाला ध्यानात आंतरिक स्थैर्य व निश्चल आनंद अनुभवायला मिळतो. हाच मानवी उत्क्रांतीचा खरा टप्पा आहे—बाह्य प्रगतीपेक्षा अंतर्गत परिवर्तन.


थोडक्यात ,मणिपूर चक्र—धर्माचा दीपस्तंभ,

संतोष, समाधान, करुणा, प्रेम आणि उत्क्रांती हे गुण नैतिक शिकवण नसून, मणिपूर चक्र शुद्ध झाल्यावर सहज प्रकट होणारी चेतना आहे.


संदर्भ - परम पूज्य माताजी श्री निर्मला देवी प्रणित सहजयोग.

आध्यात्मिक उन्नतीसाठी संपर्क करा -

Sahajayogapune.org

Sahajayogamumbai.org 


लेखन - योगीराज देवकर.

Saturday, 14 February 2026

स्वाधिष्ठान चक्र

 गुणांबद्दल बोलू काही !

स्वाधिष्ठान चक्र : दुसरे चक्र.


स्वाधिष्ठान चक्र मानवी सृजनशीलतेचे आणि नवनिर्मितीचे ऊर्जाकेंद्र आहे.मानवी जीवन केवळ जगण्यासाठी नाही, तर घडवण्यासाठी आहे. विचार करणे,कल्पना करणे,समस्या सोडविणे, अनुभवातून शिकणे, नव्याने काही निर्माण करणे आणि त्या निर्मितीतून सौंदर्य अनुभवणे—ही मानवी अस्तित्वाची खरी ओळख आहे. या साऱ्या प्रक्रियेचे सूक्ष्म ऊर्जाकेंद्र म्हणजे स्वाधिष्ठान चक्र होय.


स्वाधिष्ठान चक्र मानवाच्या सृजनात्मक शक्तीचे, नवनिर्मितीचे, शुद्ध,निर्मळ, भावनात्मक विचारांचे आणि सौंदर्यबोधाचे केंद्र आहे. हे चक्र संतुलित असले की माणूस केवळ यांत्रिक जीवन न जगता, संवेदनशील, सर्जनशील आणि आनंददायी जीवन जगतो.


१) सृजनात्मकता :

सृजनात्मकता म्हणजे  काहीतरी नवीन शक्यता निर्माण करण्याची क्षमता. ती केवळ चित्रकला, संगीत किंवा साहित्यापुरती मर्यादित नसून, इतरांचे प्रश्न,

समस्या सोडवणे,

नवे विचार,नव्या कल्पना मांडणे,

दैनंदिन जीवनात नाविन्य आणणे,

नाती समजून घेणे,

या सर्व ठिकाणी कार्यरत असते.

स्वाधिष्ठान चक्र जागृत असेल तर माणूस नुसता अनुकरण करणारा न राहता निर्मिती करणारा बनतो. इतिहासातील महान शास्त्रज्ञ, कलाकार, संशोधक हे सर्व स्वाधिष्ठान चक्राच्या गुणांची जिवंत उदाहरण आहेत. सृजनात्मकतेशिवाय मानवी प्रगतीच शक्य नाही—म्हणूनच हा गुण मानवासाठी अत्यंत आवश्यक आहे.


२) नवनिर्मिती : 

नवनिर्मिती म्हणजे जुन्याला नाकारून नव्याचा स्वीकार करणे नव्हे, तर अनुभवातून अधिक परिपूर्ण गोष्ट घडवणे.

स्वाधिष्ठान चक्र व्यक्तीला

कल्पनाशक्ती देते,

प्रयोगशील बनवते,

भीतीपेक्षा शक्यतेकडे पाहायला शिकवते,

आजच्या वेगवान, बदलत्या जगात जो माणूस नवनिर्मिती करू शकतो तोच टिकतो. नवनिर्मिती ही केवळ उद्योग, तंत्रज्ञानापुरती मर्यादित नसून विचार, शिक्षण, नातेसंबंध आणि समाजरचना यांनाही आकार देते. त्यामुळे स्वाधिष्ठान चक्राचा हा गुण मानवी उत्क्रांतीसाठी अनिवार्य ठरतो.


३) भावनात्मक विचार : बुद्धी आणि हृदय यांचा समतोल.भावना नसतील तर माणूस कोरडा आणि कठोर बनतो; फक्त भावना असतील तर तो अस्थिर होतो.

स्वाधिष्ठान चक्र शुद्ध,निर्मळ भावनांना विचारांची दिशा देते.

यामुळे व्यक्ती

इतरांच्या भावनांची कदर करते,

सहानुभूती आणि करुणा विकसित करते,

स्वतःच्या भावना समजून घेत नियंत्रित करते,

भावनात्मक विचारामुळेच नाती टिकतात, समाज जुळून राहतो आणि माणूस माणसाशी जोडला जातो. हा गुण नसता तर मानवी जीवन केवळ व्यवहारिक आणि निर्जीव झाले असते.


४) सौंदर्याची जाण :

सौंदर्य म्हणजे फक्त बाह्य आकर्षण नाही, तर

विचारातील सौंदर्य,

आचरणातील सौंदर्य,

शब्दातील माधुर्य,

कृतीतील समतोल.

स्वाधिष्ठान चक्रामुळे माणूस निसर्ग, कला, संगीत, साहित्य आणि जीवनातील सूक्ष्म आनंद अनुभवू शकतो. सौंदर्याची जाण माणसाला आनंदी, शांत आणि समाधानशील बनवते. जीवन केवळ जबाबदाऱ्यांचे ओझे न राहता एक सुंदर प्रवास बनतो.


थोडक्यात, जेव्हा हे चक्र शुद्ध असते, योग्य प्रकारे कार्य करते, तेव्हा माणूस केवळ जगत नाही—तो घडवत राहतो, हे जग आहे त्यापेक्षा सुंदर करण्यासाठी कार्यरत राहतो आणि अर्थपूर्ण जीवन जगतो.


कुंडलिनी जागृतीनंतर जेव्हा ही शक्ती या चक्रातून प्रवाहित होते, तेव्हा माणसाच्या जीवनात नवनिर्मिती, सौंदर्यबोध आणि संतुलित भावना सहज प्रकट होऊ लागतात.


सृजनात्मकता अहंकारातून नसून निर्मळ प्रेरणेतून उत्पन्न होते—म्हणजेच “मी करतो.” या भावनेऐवजी “हे आपोआप घडते.” अशी सहज अवस्था निर्माण होते.

या चक्राचे संतुलन असल्यास भावना अतिरेक न होता विचारांशी जोडल्या जातात. त्यामुळे व्यक्ती संवेदनशील, सहानुभूतीशील आणि सौम्य बनते. यालाच भावनात्मक परिपक्वता असे म्हटले जाते. भावना शुद्ध झाल्या की नाती शुद्ध होतात आणि जीवनात शांतता प्रस्थापित होते.


संदर्भ - परम पूज्य माताजी श्री निर्मला देवी प्रणित सहजयोग.

आध्यात्मिक उन्नतीसाठी संपर्क करा -

Sahajayogapune.org

Sahajayogamumbai.org 


लेखन - योगीराज देवकर.

Friday, 13 February 2026

मूलाधार

 गुणांबद्दल बोलू काही !

मूलाधार चक्र :


पावित्र्याचे व अबोधितेचे पवित्र आसन म्हणजे मूलाधार चक्र.मानवी सूक्ष्म शरीर हे केवळ भौतिक रचना नसून, ते एक सूक्ष्म आध्यात्मिक यंत्रणा आहे. या सूक्ष्म प्रणालीतील सर्वात मूलभूत, पवित्र आणि संरक्षक केंद्र म्हणजे मूलाधार चक्र. याच चक्रात आदिशक्ती कुंडलिनी माता आपल्या अबोधितेच्या पूर्ण पावित्र्यात वास करते. म्हणूनच मूलाधार चक्राला सर्व धर्मांचे, सर्व संस्कारांचे आणि सर्व आध्यात्मिक उन्नतीचे मूळ मानले जाते.


१) अबोधिता : हा गुण आत्म्याचा सहज स्वभाव आहे. श्री माताजी निर्मला देवी सांगतात, “Innocence is the source of wisdom.”

अबोधिता म्हणजे बालकासारखी निष्कलंक अवस्था—जिथे मनात गणित नाही, चलाखी नाही, अहंकार नाही. ही अवस्था म्हणजे आत्म्याचा सहज, नैसर्गिक स्वभाव आहे.

मूलाधार शुद्ध असेल तर साधक विचारांच्या गुंतागुंतीत अडकत नाही. ध्यानात त्याचे मन सहज शांत होते, आणि कुंडलिनीला वर चढण्यासाठी सुरक्षित, पवित्र आधार मिळतो. अबोधिता नष्ट झाली की आध्यात्मिक प्रगती थांबते, कारण कुंडलिनी माता फक्त पवित्र व अबोध वातावरणातच जागृत राहते.


२) पावित्र्य : पावित्र्य ही  कुंडलिनीचे संरक्षण करणारी शक्ती आहे.

पावित्र्य हा केवळ नैतिक विषय नसून सूक्ष्म आध्यात्मिक नियम आहे. मूलाधार चक्र हे धर्मतत्त्वाचे केंद्र आहे. येथे पावित्र्य भंग झाले की, कुंडलिनी संकुचित होते, ध्यानात स्थैर्य राहत नाही आणि आत्मसाक्षात्काराची गती मंदावते.

पावित्र्य म्हणजे:

विचारांची शुद्धता,

दृष्टीची संयमित अवस्था,

नात्यांतील आदर,

शरीर, मन आणि आत्म्याचे संतुलन आहे.


३) विवेक : व्हायब्रेशन्सद्वारे सत्याची ओळख करणे. विवेक हा बौद्धिक नसून व्हायब्रेशनल (चैतन्याधिष्ठित) असतो. मूलाधार चक्र शुद्ध असले की साधकाला आपल्या बोटांवरून व्हायब्रेशन्सद्वारे काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हे सहज कळते.

हा विवेक माणसाला:

अंधश्रद्धेपासून वाचवतो,

खोट्या गुरूंना ओळखण्याची शक्ती देतो,

अतिरेक व विकृतींपासून दूर ठेवतो,

श्री माताजी याला ''सत् 

असत् विवेक", "Intelligence to discriminate between truth and untruth ."  सद्सद्विवेक असे म्हणतात. तसेच “You must know the truth on your central nervous system.”

हा अनुभवात्मक विवेक मूलाधाराच्या स्थैर्यावरच अवलंबून असतो असे वर्णन करतात.


४)  पराक्रम : ही  धर्मरक्षणासाठीची शांत शक्ती आहे.

मूलाधारातील पराक्रम हा आक्रमक नसून धर्माच्या बाजूने उभे राहण्याचा आत्मिक धैर्यभाव आहे. पराक्रम म्हणजे अहंकाराने लढणे नव्हे, तर सत्यावर स्थिर राहणे होय .


हा पराक्रम साधकाला:

अधार्मिकतेपासून स्पष्ट नकार देण्याची ताकद देतो,

स्वतःच्या पावित्र्याचे संरक्षण करण्याचे सामर्थ्य देतो,

समाजात सत्याचे तत्त्व निर्भयपणे मांडण्याची क्षमता देतो,

पराक्रम नसला तर विवेक असूनही साधक डगमगतो.


मूलाधार शुद्ध नसल्यास काय होते?


सहजयोगाच्या अनुभवात दिसते की मूलाधार कमजोर असेल तर:


ध्यानात अस्थैर्य येते,

डाव्या किंवा उजव्या बाजूची अतिरेक प्रवृत्ती वाढते,

व्हायब्रेशन्स कमकुवत होतात,

साधक अध्यात्मात टिकत नाही,

म्हणूनच श्री माताजी मूलाधार शुद्धीवर विशेष भर देतात.


थोडक्यात , मूलाधार चक्र म्हणजे आत्मसाक्षात्काराच्या मंदिराचा पाया आहे.

अबोधिता—आत्म्याची भाषा आहे,

पावित्र्य—कुंडलिनीचे कवच आहे,

विवेक—सत्याची ओळख आहे,

आणि पराक्रम—धर्माचा रक्षक आहे.


संदर्भ - परम पूज्य माताजी श्री निर्मला देवी प्रणित सहजयोग.

आध्यात्मिक उन्नतीसाठी संपर्क करा

Sahajayogapune.org

Sahajayogamumbai.org 


लेखन - योगीराज देवकर.

शुद्ध सत्वगुणी sushumna nadi

 गुणांबद्दल बोलू काही!

शुद्ध सत्वगुणी सुषुम्ना नाडी :


मानवाच्या सूक्ष्म शरीरात 

सुषुम्ना नाडी ही मध्यातून जाणारी नाडी आहे.

ती वर्तमान, आत्मा, साक्षीभाव, धर्म आणि सत्य यांचे प्रतीक आहे.

इडा (भावना) व पिंगला (कृती) संतुलित झाल्यावरच सुषुम्ना (ज्ञान) नाडी सक्रिय होते.


सुषुम्ना नाडीवरील सत्त्वगुण – गुण की दोष ?


सत्त्वगुण हा स्वतः गुण आहे,इथे सर्व षडरिपु गळून पडतात. तरी इथेही शुद्ध गुण आणि शबल गुण असा भेद केला जातो. शुद्ध गुण परमार्थाकडे नेतो तर शबल गुण प्रपंचाकडे नेतो . सत्व, रज ,तम या तीन त्रिगुणांच्या योगाने जीवन चालते.

उदाहरणार्थ ...

प्रापंचिक त्रिगुण : ' असा माणूस जग माझ्यासाठी आहे ही भावना असल्याने स्वार्थमय असतो.'

'सत्ताधारी ,श्रीमंत,कलावंत,राजविलासी आणि चैनी पुरुष आदर्श मानले जातात,असे व्हावेसे वाटते .'


पारमार्थिक त्रिगुण : ' असा माणूस मी जगासाठी आहे ही भावना असल्याने निःस्वार्थी असतो.'

' साधू,संत, महात्मे,योगी,त्यागी, आत्मज्ञानी व भगवंताचे प्रेमळ भक्त आदर्श असतात , तसे व्हावेसे वाटते.' 


सत्वगुण:

आविष्कार,

उत्क्रांती,

प्रकाश,धर्म,ज्ञान,

शांती,समाधान,

निःस्वार्थ प्रेम,

ईश्वर प्रेम,

विवेकी वृत्ती,

दानशूर,

उत्सवप्रिय ,

सजगता.

शुद्ध आत्मज्ञान होणे ही सत्वगुणाची खरी करामत आहे. अशी व्यक्ती पूर्ण वासनारहित , अभिमानरहित,अत्यंत दयाळू,नम्र,परोपकारी ,विशाल अंतःकरणाची असते .


सत्त्वगुण म्हणजे आत्म्याचा प्रतिबिंबित गुणधर्म. पण अति सत्त्वाभिमान झाला तर,

अध्यात्मिक अहं.

“मी शुद्ध आहे.” ही सूक्ष्म गर्वभावना येते. 

प्रतिक्रिया व्यक्त केल्या जातात. अहंकार म्हणजे प्रतिक्रिया ,त्या नियंत्रणात ठेवा,प्रतिक्रिया द्यायच्याच असतील तर अत्यंत गोड,चांगल्या द्या,अहंकार अत्यंत कोमल,गोड, प्रेममय आणि विनोदी असू द्या. सत्त्वगुणातही नम्रता आवश्यक आहे.


सुषुम्ना नाडी शुद्ध व संतुलित असेल तर होणारे लाभ: 


शारीरिक लाभ:

ऑटोनॉमिक नर्व्हस सिस्टिम संतुलित राहते,

तणावजन्य आजार कमी,

शरीरात हलकेपणा,

आरोग्य सुधारते.


भावनिक लाभ:

शांतता व समाधान,

इच्छा,आशा,आकांक्षा,भावना शुद्ध राहतात,

प्रतिक्रिया नसतात, प्रतिसाद असतो.


बौद्धिक लाभ :

विवेक कार्यरत होतो,

एकाग्रता वाढते, हुशारीत वाढ होते.


आध्यात्मिक लाभ:

कुंडलिनी सहज व नियमित उर्ध्वगामी होते,

चक्रे शुद्ध होऊ लागतात,

ध्यान खोल व सहज होते,

आत्मसाक्षात्कार टिकून राहतो,

वर्तमानात स्थिरता,

सूक्ष्म संवेदनांची जाणीव होते,

अंतर्ज्ञान जागृत होते,

निर्विचार ( Thoughtless awareness) अवस्था प्राप्त होते,

निर्विकल्प (Doughtless awareness) अवस्था प्राप्त होते,

निरानंद अनुभवास येतो.


सुषुम्ना सक्रिय मानवाचे जीवन:

कृती होते पण कर्तेपणा नसतो.

प्रेम असते पण आसक्ती नसते.

शिस्त असते पण ताण नसतो.

नेतृत्व असते पण अहं नसतो.


सत्वगुणात प्रतिभा जागृत होते, बुद्धी आत्मप्रकाशाने भरून जाते. तात्पर्य ,स्वरूप साक्षात्कार होण्यास लागणारी पूर्वतयारी होते.


संदर्भ - परम पूज्य माताजी श्री निर्मला देवी प्रणित सहजयोग.

दासबोध ग्रंथ.

अधिक माहितीसाठी -

Sahajyogapune.org

Sahajayogamumbai.org


लेखन - योगीराज देवकर .

Thursday, 12 February 2026

शुद्ध रजोगुणी पिंगला नाडी

 गुणांबद्दल बोलू काही !

शुद्ध रजोगुणी पिंगला नाडी :


मानवाच्या सूक्ष्म शरीरातील उजव्या बाजूला असलेली ही सूर्य तत्त्वाशी संबंधित नाडी आहे.

पिंगला नाडी आपल्या क्रिया, विचार, बुद्धी, अहंकार, नियोजन, कार्यक्षमता आणि भविष्याभिमुखता यांचे प्रतिनिधित्व करते.


पिंगला नाडीवरील रजोगुण – गुण की दोष?


रजोगुण स्वतः दोष नाही, तो मानवाच्या उत्क्रांतीसाठी आवश्यक गुण आहे.

पण तो अतिरिक्त झाला की तो दोषात परिवर्तित होतो.


रजोगुणाचे नैसर्गिक गुण:

स्वाभिमान,

कृतीशीलता,उद्योगिपणा,

उर्जा,

ध्येयपूर्ती,लढावू वृत्ती,महत्वाकांक्षा,

परिश्रम,गतिमानता,

नियोजन,

बुद्धीची हुशारी, हे सर्व गुण नसते तर मानव प्रगतीच करू शकला नसता.

सत्वगुणी माणूस खऱ्या अर्थाने माणूस असतो. पण शुद्ध रजोगुणी माणूसुद्धा सत्वगुणी मानायला हरकत नाही.


पण याच रजोगुणाचा  अतिरेक झाला किंवा हे गुण प्रपंचाकडे वळले की त्याचा दुरपयोग होतो आणि मानवात ...


अहंकार,

आक्रमकता,

अतिविचार,

चिडचिड,

अधीरता,

स्पर्धात्मक वृत्ती,

कामाचा अतिरेक (workaholism),

वासना,

क्रोध,मद,लोभ,

इर्षा,गर्व, असे दोष निर्माण होतात.


पिंगला नाडी शुद्ध व संतुलित असेल तर होणारे लाभ :


शारीरिक लाभ: 

नर्व्हस सिस्टिम संतुलित राहते.

उष्णतेमुळे होणारे त्रास कमी होतात.

डोकेदुखी, तणाव, रक्तदाबाशी संबंधित त्रास कमी होतात.


मानसिक लाभ :

विचार स्पष्ट व तर्कशुद्ध होतात.

निर्णयक्षमता वाढते.

विवेकबुद्धी जागृत होते.

विचार कृतिशील होतात.


भावनिक लाभ :

उर्जा स्थिर राहते (over-excited होत नाही).

आळस न राहता उत्साह टिकतो.

कामात सातत्य येते.


आध्यात्मिक लाभ:

अहंकार कमी होतो.

“मी करतो” या भावनेऐवजी “वैश्विक शक्ती करते” हा भाव येतो.

पिंगला नाडी संतुलित होते तेव्हा ध्यान चांगले होते.


असा मानव कृती करतो, पण कृतीत अडकत नाही.


संदर्भ - परम पूज्य माताजी श्री निर्मला देवी प्रणित सहजयोग.

दासबोध ग्रंथ.

अधिक माहितीसाठी -

Sahajayoapune.org

Sahajayogamumbai.org


लेखन - योगीराज देवकर.

Wednesday, 11 February 2026

शुद्ध तमोगुणी इडा नाडी.

 गुणांबद्दल बोलू काही !

शुद्ध तमोगुणी इडा नाडी : 


मानवाच्या सूक्ष्म शरीरात  डाव्या बाजूला असलेली नाडी ही चंद्र तत्त्वाशी संबंधित नाडी आहे.

इडा नाडी आपल्या भावना, स्मृती, अवचेतन, इच्छा आणि भक्ती यांचे प्रतिनिधित्व करते.


इडा नाडीवरील तमोगुण – गुण की दोष?


सत्व, रज आणि तम या तीन गुणांच्या योगाने जीवन चालते. प्रत्येक गुणात शुद्ध व शबल असा भेद केला जातो. शुद्ध गुण परमार्थाकडे नेतो तर तोच गुण शबल असेल तर प्रपंचाकडे खेचतो . जे निर्मळ असते ते शुद्ध आणि जे मिश्रित असते ते शबल होय. शबल बाधक असते.


तमोगुण स्वतः दोष नाही, पण कमी/अतिरिक्त झाला तर तो दोष बनतो.


तमोगुणाचे नैसर्गिक गुण:

विश्रांती,

चांगली झोप,

पावित्र्य,

स्थैर्य,

शुद्ध इच्छा,

भावनिक प्रगल्भता,

समर्पण,

सर्व मानवासाठी हे आवश्यक गुण आहेत.


पण तमोगुण असंतुलित झाला तर…

आळस,सुस्ती,

जडत्व,अती झोप,

उदासीनता,

नैराश्य,

भीती,असुरक्षितता,

भूतकाळात अडकून राहणे,

नकारात्मक आठवणींचा पगडा,

काम,मोह,मत्सर, असे दोष निर्माण होतात.


तमोगुणातील भयंकर विकार स्वार्थ असतो पण तो अमर्याद असतो. आसक्ती असते पण ती अवास्तव असते.

अनुष्ठान असते पण ते आततायी असते.

साधन असते पण ते अघोरी असते.

तमोगुणी माणूस संगती करण्यास कठीण असतो.नाईलाजाने त्याला माणूस म्हणायचे इतकेच.


इडा नाडी शुद्ध व संतुलित असेल तर होणारे लाभ:


शारीरिक लाभ:

चांगली झोप लागते.

मानसिक तणावातून होणारे आजार कमी होतात.


मानसिक लाभ:

मन शांत, स्थिर व प्रसन्न राहते.

नैराश्य, भीती, तणाव कमी होतो.

भावनांवर नियंत्रण येते.

भूतकाळाचा भार सुटतो.


भावनिक लाभ:

प्रेम,करुणा सहज वाहते.

राग, द्वेष, मत्सर कमी होतो.

नात्यांमध्ये समजूतदारपणा येतो.

संवेदनशीलता वाढते.


आध्यात्मिक लाभ:

इडा नाडी संतुलित होते तेव्हा ध्यान चांगले होते.

शीतलता अनुभवास येते.

शुद्ध इच्छा जागृत होतात.


असा मानव भावनांचा गुलाम न राहता भावनांचा साक्षी बनतो.


संदर्भ - परम पूज्य श्री माताजी निर्मला देवी प्रणित सहजयोग.

दासबोध ग्रंथ.

अधिक माहितीसाठी - 

Sahajayogapune.org

Sahajayogamumbai.org.org


लेखन - योगीराज देवकर.