गुणांबद्दल बोलू काही !
विशुद्धी चक्र: पाचवे चक्र.
मानवी सूक्ष्म शरीरातील विशुद्धी चक्र हे कंठप्रदेशात स्थित असून, ते संवाद, अभिव्यक्ती, सामूहिकता आणि साक्षीभाव यांचे केंद्र मानले जाते. व्यक्तीची अंतर्गत शुद्धता आणि बाह्य व्यवहार यांचा सेतू म्हणून विशुद्धी चक्र कार्य करते. या चक्राचे संतुलन म्हणजे केवळ चांगली वाणी नव्हे, तर शुद्ध विचार, सत्यनिष्ठ कृती आणि सामूहिक चेतनेशी जोडलेपण होय.
१) सामूहिकता:
विशुद्धी चक्राचा सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे सामूहिकता. “मी”पणातून “आपण”कडे नेणारी ही चेतना आहे. व्यक्ती स्वतःला समाजाचा, कुटुंबाचा, राष्ट्राचा , संपूर्ण विश्वाचा ,आणि अखेरीस संपूर्ण मानवजातीचा भाग समजू लागते. याचा आध्यात्मिक अर्थ म्हणजे आत्मा परमात्म्याशी सामूहिक होणे.सामूहिकतेमुळे अहंकार विरघळतो, मतभेद कमी होतात आणि सहकार्य, सहानुभूती व समन्वय वाढतो.
२) साक्षीभाव:
साक्षीभाव म्हणजे परिस्थिती, भावना व विचार यांना आसक्त न होता निरीक्षण करण्याची क्षमता. विशुद्धी चक्र शुद्ध असले की व्यक्ती प्रतिक्रिया देण्याऐवजी प्रतिसाद देऊ लागते.
यामुळे मानसिक स्थैर्य, विवेक आणि शांतता प्राप्त होते. साक्षीभावामुळे व्यक्ती नात्यांमध्ये समतोल राखते, वाद टाळते आणि सत्याला समजून घेण्याची क्षमता वाढवते.
३) बोलण्यातील माधुर्य:
शब्द हे केवळ ध्वनी नसून ते ऊर्जा वाहक असतात. विशुद्धी चक्र संतुलित असले की वाणीत माधुर्य, नम्रता आणि सौम्यता येते.
अशा व्यक्तीची वाणी मनाला स्पर्श करते, संघर्ष शमवते आणि विश्वास निर्माण करते. कठोर सत्यसुद्धा प्रेमपूर्वक मांडण्याची कला याच चक्रातून विकसित होते.
४) व्यवहार चातुर्य व संपर्क कुशलता:
विशुद्धी चक्र व्यक्तीला योग्य वेळी ,योग्य शब्द,योग्य पद्धतीने सुसंवाद साधण्याची बुद्धी देते.
यामुळे सामाजिक स्वीकार, नातेसंबंधांची दृढता आणि व्यावसायिक यश वाढते. संवादातील स्पष्टता गैरसमज टाळते व विश्वास निर्माण करते.
५) कुटनितिज्ञता: (राजनैतिक/सामाजिक सूज्ञता):
कुटनितिज्ञता म्हणजे फसवणूक नव्हे, तर परिस्थितीची अचूक जाण ठेवून शहाणपणाने वागण्याची क्षमता. विशुद्धी चक्र जागृत असलेली व्यक्ती शब्दांचा गैरवापर न करता, सत्याशी प्रामाणिक राहूनही परिस्थिती हाताळू शकते.
हा गुण
कौटुंबिक,सामाजिक समन्वय, प्रशासन आणि नेतृत्व यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतो.
६) सत्यनिष्ठा:
येथे सत्य म्हणजे केवळ खोटे न बोलणे नव्हे, तर विचार, बोलणे आणि कृती यातील एकरूपता होय .
सत्यनिष्ठ व्यक्तीवर समाज विश्वास ठेवतो. अंतःकरणात अपराधभाव नसल्याने मानवाचे जीवन हलके, निर्भय व आनंदी होते.
संदर्भ - परम पूज्य माताजी श्री निर्मला देवी प्रणित सहजयोग.
आध्यात्मिक उन्नतीसाठी संपर्क करा -
Sahajayogapune.org
Sahajayogamumbai.org
लेखन - योगीराज देवकर.
No comments:
Post a Comment